शेतकऱयांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
एपीएमसी तसेच जय किसान होलसेल मार्केटमुळे शेतकऱयांच्या मालाला योग्य भाव मिळू शकतो. याचबरोबर जय किसान मार्केट हे सौंदत्ती, बैलहोंगल, बेळगाव तालुका, कित्तूर यासह इतर परिसराला फायद्याचे आहे. तेव्हा दोन्ही मार्केट सुरू करावीत, हवे तर सरकारने दोन्हींवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य मार्गसूची जारी करावी. मात्र, दोन्ही मार्केटांना परवानगी द्यावी, अशी मागणी नेगील योगी रयत संघाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून एपीएमसी आणि जय किसान होलसेल मार्केटमध्ये वाद सुरू आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. एपीएमसी मार्केटमध्येही व्यापार सुरूच ठेवावा तसेच जय किसान मार्केटमध्येही व्यापार सुरू करण्यास परवानगी द्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष बसवराज मोकाशी, संघटनेचे संचालक सुरेश वाली, रवी पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.