अण्णा हजारे यांची टीका : शेतकरी आंदोलनाला पाठिंबा
प्रतिनिधी/ पुणे, नगर
कृषीप्रधान देशात शेतकऱयाला सरकारकडून दिली जाणारी वागणूक योग्य नाही. चर्चा करून प्रश्न सोडविण्याऐवजी सरकार शेतकऱयांचे अहिंसेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. आंदोलन करणारे शेतकरी पाकिस्तानातून आले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करीत समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारला रविवारी फटकारले. या आंदोलनाला हजारे यांनी पाठिंबाही दिला आहे.
कृषी कायद्यांच्या विरोधात सध्या पंजाब आणि परिसरातील शेतकऱयांचे आंदोलन सुरू आहे. याच शेतकरी संघटना हजारे यांच्या लोकपाल आणि शेतकऱयांच्या प्रश्नावरील आंदोलनावेळी दिल्लीत अण्णांसोबत आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. त्यावेळी अण्णा म्हणाले, निवडणुकीच्या वेळी मते मागायला शेतकऱयांच्या बांधावर जाता, तर मग शेतकऱयांचे आंदोलन सुरू असताना, त्यांच्याशी चर्चा करायला का जात
नाही? दिल्लीत उद्या जर हिंसा भडकली, तर त्याला जबाबदार कोण? कृषीप्रधान देशात शेतकऱयाला सरकारकडून दिली जाणारी ही वागणूक योग्य नाही. सरकार चर्चा करून प्रश्न सोडविण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्याशी शत्रूप्रमाणे सरकार वागत आहे. मुळात शेतकऱयांना पुन्हा-पुन्हा आंदोलन करावे लागावे, हेच आपल्या देशाचे दुर्दैव आहे.