राष्ट्रीय महामार्गचे सहापदरीकरण, होनगा ते कोगनोळीपर्यंतच्या शेतकऱयांच्या नावे नोटीस
प्रतिनिधी /बेळगाव
पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरण होणार आहे. त्यासाठी होनगा ते महाराष्ट्रच्या हद्दीपर्यंत शेतकऱयांच्या जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतल्या आहेत. त्या सर्व शेतकऱयांनी 10 दिवसांच्या आत आपल्या जमिनी संदर्भातील सर्व कागदपत्रे उपविभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण क्रमांक 4, शिवबसवनगर येथील कार्यालयात आणून द्यावीत, अशा प्रकारचे नोटिफीकेशन एका कन्नड आणि इंग्रजी दैनिकांतून देण्यात आले आहे. प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांच्या नावे नोटीस देण्यात आली आहे.
होनग्यापासून कोगनोळीपर्यंतच्या शेतकऱयांची नावे देखील त्या नोटिफीकेशनमध्ये दिली गेली आहेत. जमिनीच्या मुळ मालकाने विक्री केलेले किंवा हक्कपत्र यावषीचा जमिनीचा उतारा, महसूल विभागाची पावती, एनए असेल तर त्याबाबतची सर्व कागदपत्रे, पिटीसीट आणून द्यावीत, असे आवाहन सहाय्यक संचालक नगरविकास योजना प्राधिकरणाने केले आहे. जे शेतकरी 10 दिवसांच्या आत आपली कागदपत्रे देणार नाहीत, मात्र त्यांच्या जमिनी संदर्भात सध्या आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांची नोंद केली जाणार आहे. या नोटीस पत्रकामध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सर्व जमीन ताब्यात घेतल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्या जमिनीमध्ये कोणत्याही प्रकारची विकासकामे किंवा पिके घेऊ नयेत, कोणीही इमारती बांधणे किंवा पिके घेतली तर संबंधितांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई दिली जाणार नाही, असेही या नोटिसीमध्ये म्हटले आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चे सहापदरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी सर्व शेतकऱयांनी अनुमती दिली आहे. मात्र आता त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार आहे. मात्र त्यांनी सर्व कागदपत्रे दहा दिवसांत संबंधित कार्यालयात आणून देणे बंधनकारक आहे. शेतकऱयांनी किंवा त्यांच्या वकिलांनी ही कागदपत्रे दिली पाहिजेत, असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे. एकूणच राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण आता लवकरच होणार असल्याचे या नोटीसीवरून दिसत आहे. सध्या कोणते पीक आहे याचा उल्लेख असावा. सदर जमीन खरेदी-विक्री किंवा घानवट ठेवली असेल तर त्याबाबत देखील माहिती देणे गरजेचे
आहे.
यापूर्वी नोटिफीकेशन दिले आहे. त्यामध्ये कोणीही आक्षेप नोंदविला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने भूस्वाधीन कायद्यांतर्गत सदर जमीन कब्जात घेतली आहे. एनएच- 4 किलो मीटर क्रमांक 515 ते महाराष्ट्र हद्द 592.705 पर्यंतच्या शेतकऱयांनी कागदपत्रे दिली पाहिजेत. होनगा, भरमानट्टी, बंबरगा, भुतरामहट्टी, हालभांवी, रामदुर्ग, सुतगट्टी, बिरनहोळी, मणगुत्ती, हत्तरगी, हंचनाळ, उळागड्डी-खानापूर, चिक्कलगुड, हेब्बाळ, गोटूर, संकेश्वर ग्रामीण, सोलापूर, कणगला, शिप्पूर, तवंदी, यरनाळ, गवाण, निपाणी, सौंदलगा, कोगनोळी या गावातील शेतकऱयांच्या जमिनी या रस्त्यामध्ये जाणार आहेत. तेंव्हा त्यांनी दहा दिवसांच्या आत कागदपत्रांसह आपली माहिती द्यायची आहे.