सरकारने लोकसभेत दिली माहिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशातील शेतकऱयांसाठी विशिष्ट ओळखपत्र निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. लोकसभेत पी. वेलुसामी आणि के. षणमुग सुंदरम यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरादाखल कृषी तसेच किसान कल्याण मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली. शेतकऱयांसाठी विशिष्ट ओळखपत्र निर्माण करण्याची योजना आहे का असा प्रश्न खासदारांनी विचारला होता.
कृषी आणि किसान कल्याण मंत्रालयाकडून देशातील शेतकऱयांसाठी विशिष्ट ओळखपत्र निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱयांसाठी असलेल्या सर्व योजनांशी हे ओळखपत्र जोडले जाणार असल्याचे तोमर यांनी सांगितले. या ओळखपत्रामुळे ई-नो यॉर फार्मर (ई-केवायएफ) माध्यमातून शेतकऱयाची ओळख सर्टिफाईड करण्याची तरतूद आहे, यामुळे विविध योजनांच्या अंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी विविध विभागांना भौतिक दस्तऐवज पुन्हा सादर करण्याची आवश्यकता भासणार नाही. तसेच यामुळे क्षेत्र आधारित तसेच अनुकूल सल्ला सहजपणे प्राप्त करता येईल आणि याच्या माध्यमातून प्रतिकूल हवामानामुळे पिकाला झालेल्या नुकसानीचे आकलन सहजपणे होणार असल्याचे तोमर म्हणाले.