वार्ताहर /झुआरीनगर
मुरगांव तालुक्यातील कासावली भागातच शेती शिल्लक राहिलेली आहे. येथील आरोसी कुएली भागातच मोठय़ा प्रमाणात शेती केली जाते. परंतु सध्या शेतकऱयांना सतावणाऱया विविध समस्यांमुळे यावर्षी या भागातील बहुतेक शेतजमीन पडिक ठेवण्यात आलेली आहे.
पूर्वी सांकवाळ, कुठ्ठाळी तसेच कासावली भागात मोठय़ा प्रमाणात शेती केली जायची. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून सांकवाळची शेतजमीन पडिक आहे. व कुठ्ठाळी भागात नावापुरतीच शेती राहिलेली आहे. सध्या फक्त कासावलीतच शेतकरी वर्ग आहे. नजर पोहचत नाही अशी आरोसी, कुएली भागात शेतजमीन आहे. परंतु यंदा येथील शेतकऱयानी आपली शेतजमीन पडिक ठेवलेली आहे. विविध समस्यामुळे येथील शेतकरीर त्रस्त आहेत.
सध्या शेती करणे खूपच कठीण झालेले आहे. आपल्या पूर्वजानी जपून ठेवलेला हा पारंपारिक शेतीचा व्यवसाय आजतागायत आपण जीवंत ठेवलेला आहे. पूर्वी भातपीक भरपूर मिळायचे. परंतु सध्या अनेक समस्यांमुळे शेती कामे मुश्कील बनलेले आहेत. या व्यवसायात आता तोटाच जास्त आहे. फक्त ही परंपरा जीवंत ठेवण्यासाठीच शेती केली जाते. आजच्या पिढीला यात जास्त रस नाही असे येथील शेतकरी मार्टिना रिबेला या 80 वर्षीय महिलेने सांगितले. आजही ती उमेदीने व हिंमतीने शेतातील कामे करते. सध्या शेतीच्या सर्व कामासाठी दुसऱयांवर अवलंबून रहावे लागते. शेतकाम करण्यासाठी एकच मशिन मिळते. त्यामुळे या मशिनसाठी कित्येक दिवस थांबावे लागते. मजूर टाकून इतर कामे करावी लागतात. त्यांची मजुरी पण खूप जास्त आहे. येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे फक्त एकच जया नामक भातशेतीचे पीक घेतले जाते. काही शेतकरी नंतर चवळी, अळसांडय़ाचे पीक घेतात. मागील काही वर्षात शेतकऱयांना बरेच नुकसान सोसावे लागले. त्यामुळे सध्या फक्त उदरनिर्वाहासाठीच हा शेती व्यवसाय केला जातो असे शेतकरी ग्रेसी अब्रांचीस हिने सांगितले.
मागील काही वर्षात कापणीच्या वेळी मुसळदार पावसामुळे शेतजमीनीत पाणी भरून राहिल्यामुळे शेतकऱयांना मोठे नुकसान झाले. यावेळी मेहनतीने उगवलेली शेती कुजून गेली. शेतकऱयांना नुकसान भरपाईपण मिळाली नाही. या वर्षी चक्रीवादळामुळे अनेकांना बियाणे घालता आले नाही तर काहींचे बियाणे पावसाच्या पाण्यात वाहून गेले. शेतकऱयांनी वेर्णा भागातून हे रोप आणून लावलेले आहे. पूर्वी पावसाचे पाणी सुरळीतपणे शेतातून जायचे. परंतु सध्या या भागातील काही नाले बुजलेले आहेत तर काही नाल्यांच्या वाटाच बदललेल्या आहेत. परिणामी पावसात पाणी शेतातच राहते व शेती कुजते. अशा विविध कारणांमुळे येथील शेतकऱयांनी आपल्या जमिनी पडिक ठेवलेल्या आहेत असे शेतकरी पीटर फेर्राव यांनी सांगितले.
कासावलीतील या शेतकऱयांच्या समस्या दूर करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्या होणाऱया नुकसानीला योग्य भरपाई मिळायला पाहिजे. नाहीतर येणाऱया काळात कासावली भागातच शिल्लक असलेला हा शेतीचा व्यवसाय पूर्णतः संपेल.