वार्ताहर/ उचगाव
उचगाव ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रातील उचगाव, बसुर्ते व कोनेवाडी या तीन गावांमध्ये 2018 व 2019 या सालामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकरी वर्गासाठी शेतवडीत विहिरीची खोदाई करण्यासाठी शासनाकडून प्रत्येक शेतकऱयाला 90 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला. यातील कमी-अधिक प्रमाणात रक्कम शेतकऱयांना मिळाली. मात्र, उर्वरित मोठी रक्कम शेतकरीवर्गाला अद्याप मिळालीच नसल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकरीवर्गाने बुधवारी सकाळी ग्राम पंचायत कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोकले.
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत 41 शेतकऱयांना त्यांच्या स्वतःच्या शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी विहीर खोदाईसाठी अर्जानुसार रक्कम मंजूर झाली. त्यानुसार शेतकऱयांनी विहिरींच्या खोदाईला सुरुवात केली. विहिरींचे काम पूर्ण होऊन वर्षाचा कालावधी लोटला. या कालावधीत सर्वच शेतकऱयांना 14, 30, 40 हजार रुपये अशी रक्कम देण्यात आली आहे. मात्र, उर्वरित रकमेचा अद्याप पत्ता नाही.
विहिरींची खोदाई, बांधकामासाठी वाळू, विटा, सिमेंट, खडी, लोखंड याबरोबरच विद्युत पुरवठय़ासाठी पंपसेट व पाईप या सर्व गोष्टींसाठी जवळपास प्रत्येक शेतकऱयाला दोन ते अडीच लाखापर्यंत खर्च आला आहे. मात्र, शासनाच्या तुटपुंज्या निधीमुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडला आहे.
चालू वषीच्या हंगामात जोरदार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पिके हाती लागलीच नाहीत. विहिरींतील पाण्याने रब्बी हंगाम साधण्यासाठी शेतकरीवर्गाची धडपड चालू आहे. मात्र, पैशाअभावी कामे रखडली. विहिरींची कामे रेंगाळल्याने पुन्हा ‘बुडत्याचा पाय खोलात’ या म्हणीप्रमाणे शेतकऱयांची स्थिती झाली आहे.
येत्या पंधरा दिवसात शेतकरीवर्गाची उर्वरित रक्कम मिळाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरीबांधवांनी दिला आहे.