नेरुर येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम : पुस्तिकेचे प्रकाशन
वार्ताहर / नेरुर:
शेतकऱयांनी उपलब्ध सर्व सुविधांचा लाभ घेतल्यास कोकणातील शेतकरी खऱयाअर्थाने सुजलाम-सुफलाम होईल, असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय तथा कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्यावतीने आज नेरुर-देऊळवाडा (चव्हाटा) येथील फडके सभागृहात काजू लागवड तंत्रज्ञान व कीड-रोग व्यवस्थापन, कृषी विभागाच्या योजना आदी विषयांवर जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात मार्गदर्शन करताना नाईक बोलत होते.
नाईक पुढे म्हणाले, काही वर्षांपूर्वी कोकणातील शेतकऱयांना आर्थिक पाठबळ नव्हते. त्यात कोकणातील हवामानाचा लाभ उठवत येथील जमिनीमध्ये कोणत्या प्रतीची पिके घ्यावीत, हे नेमके ठावूक नसल्याने येथील शेतकरी संभ्रमावस्थेत सापडला होता. त्या शेतकऱयांना आर्थिक पाठबळ मिळावे, म्हणून महाराष्ट्र शासनाने अनेक आर्थिक स्वरुपाच्या योजना आणल्या. कृषी विभागाने त्या सर्व योजना येथील शेतकऱयांपर्यंत पोहचविण्यात कार्यतत्परता दाखविली. तसेच कमी खर्चात भरघोस उत्पन्न देणारी दर्जेदार काजू रोपे उपलब्ध करून दिली.
प्रारंभी वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे डॉ. राकेश गजबिये, डॉ. विजयकुमार देसाई व डॉ. संदीप गुरव यांनी शेतकऱयांना मार्गदर्शन केले. किटाणूंमुळे काजू रोपे व पिकांचे होणारे नुकसान कसे टाळता येईल, याबाबत अवगत केले. काजू रोपे लावताना किती अंतर असावे, खड्डा किती रुंद व खोल असावा, पाण्याचा पुरवठा किती व किती वर्षांपर्यंत करावा. एवढेच नव्हे, तर मिळालेल्या उत्पन्नाला जास्तीत-जास्त बाजारभाव कसा मिळेल, शासनाच्या योजनांचा लाभ कसा करून घ्यावा, याबाबत माहिती दिली.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने काजू पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन संदर्भातील पुस्तिका तालुका कृषी अधिकारी (कुडाळ) यांच्यावतीने शेतकऱयांसाठी तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेचे नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
जि. प. माजी अध्यक्ष विकास कुडाळकर, जि. प. सदस्य अमरसेन सावंत तसेच अतुल बंगे, रुपेश पावसकर, सरपंच शेखर गावडे, उपसरपंच समद मुजावर, तंटामुक्ती समिती अध्यक्ष भास्कर गावडे, तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे, मंडळ कृषी अधिकारी (कुडाळ) संदीप दोलतोडे, कृषी पर्यवेक्षक श्री. खरवडे तसेच कृषी विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस. एस. चव्हाण यांनी केले. जिल्हय़ातील शेतकरी उपस्थित होते. नेरुर ग्रामस्थ व ग्रा. पं. च्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.