हलगा-मच्छे बायपास रस्ता प्रकरणी अलारवाड क्रॉसजवळील घटनेमुळे गोंधळ, शेतकऱयांना पोलिसांनी केली अटक
प्रतिनिधी /बेळगाव
कोणतीही नोटीस नाही, नुकसान भरपाई नाही, अधिकृत कामासंदर्भात नोटीस नाही, असे असताना हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. हे बेकायदेशीर आहे. या कामामुळे माझा फार्म हाऊस आणि माझी शेती रस्त्यामध्ये जात आहे. या पोटतिडकीने एका वृद्ध शेतकऱयाने जेसीबीला दगड मारला. त्यानंतर शेतकऱयांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत प्रांताधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. वाद चिघळत गेल्याने शेतकऱयांना पोलिसांनी अटक केली. अलारवाड क्रॉस जवळील घटनेने बराच उशीर गोंधळ उडाला.
हलगा-मच्छे बायपास हा रस्ता बेकायदेशीर आहे. तुम्ही माझ्या जागेवर आलाच कसे? असे म्हणून एका वृद्धाने अधिकाऱयांना चांगलेच धारेवर धरले. मला नोटीस दिला आहे का?, मला नुकसान भरपाई दिला का? रस्त्याचे काम करण्यासाठी रितसर परवानगी आहे का? असे प्रश्न विचारुन प्रांताधिकाऱयांना धारेवर धरण्यात आले. यावेळी बराच वाद झाला. आम्हाला आदेश आहे त्यानुसार काम करत आहे, असे प्रांताधिकारी रविंद्र करलिंगण्णावर यांनी यावेळी सांगितले.
हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम दडपशाही करत सुरू आहे. गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी या रस्त्याच्या विरोधात आंदोलन करत आहेत. मच्छे येथील अनगोळकर या शेतकऱयाच्या कुटुंबीयाने तर तीव्र विरोध केला. त्यांच्या एका मुलाने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले तर एका मुलाने झाडावर चढून आत्मदहन करण्याचा इशारा दिला. या घटनेमुळे गोंधळ उडाला होता. मात्र दडपशाही करत या रस्त्याचे कामकाज सुरूच करण्यात आले आहे.
येळ्ळूर रस्त्यापासून मच्छे रस्त्यापर्यंत कामकाज तीव्र गतीने सुरू करण्यात आले आहे. केवळ दोनच दिवसांत माती टाकून रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले आहे. मात्र येळ्ळूर रस्त्याच्या पूर्व भागातील जमिनीमध्ये भात पिके जोमाने असल्यामुळे त्या ठिकाणी काम थांबविण्यात आले आहे. मात्र भात कापणी झाल्यानंतर काम करण्याचा प्रयत्न पुन्हा होणार आहे. मंगळवारी अलारवाड क्रॉसपासून काम सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी शेतकरी, अधिकारी यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली.
शेतकरी अत्यंत शांतपणे आंदोलन करत आहेत. कारण पोलिसांची दडपशाही शेतकऱयांवर सुरूच आहे. अटक करणे, मारबडव करणे हे प्रकार केले जात आहेत. यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. तरी देखील शेतकरी आंदोलन करतच आहेत. सुपीक जमिनीतून रोड होत असल्यामुळे शेतकरी हतबल झाले असून पोटतिडकीने ते आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. मंगळवारी राजू मरवे, विठ्ठल बाळेकुंद्री यांच्यासह इतर शेतकऱयांनी तीव्र आंदोलन केले आहे.