कृषी अधिकारी पुरुषोत्तम पिराजे यांची माहिती
प्रतिनिधी/ निपाणी
यंदा खरीप हंगामासाठी निपाणी विभागात बहुतांशी पेरणी कामे आटोपली आहेत. शेतकऱयांना आता पीक वाढीसाठी पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पेरणी आटोपल्यानंतर कृषी खात्यातर्फे पीक पाहणी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मोबाईलद्वारे पीक नोंद करता येणार आहे. त्यानुसार शेतकऱयांनी फार्मर ऍपद्वारे पिकांची नोंदणी करावी, असे आवाहन कृषी अधिकारी पुरुषोत्तम पिराजे यांनी केले आहे.
प्रत्येक हंगामात नियोजनाचा भाग म्हणून कोणत्या पिकाचे किती उत्पादन झाले. याची माहिती कृषी खात्यामार्फत घेतली जाते. त्यानंतर शासनामार्फत अन्नधान्य पुरवठय़ाचे नियोजन केले जाते. त्याचबरोबर महापूर, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शासनाकडून भरपाई मिळण्यासाठी पीक नोंदणी होणे आवश्यक असते. याशिवाय बँका, सहकारी संस्थांमध्ये पीक कर्जासाठी, उत्पादित बियाणांच्या मार्केंटिंगसाठी पीक नोंदणी महत्त्वाची ठरते.
गेल्या दोन दिवसांपासून निपाणी विभागात पीक पाहणी सुरू झाली आहे. त्यानुसार शेतकऱयांनी ऍन्ड्राईड मोबाईलमधून फार्मर ऍपद्वारे पिकांची नोंद करावी, 15 ऑगस्टपर्यंत ही नोंद करणे आवश्यक आहे. मोबाईलद्वारे नोंद करणे शक्य न झाल्यास अशा शेतकऱयांसाठी पुढील महिन्यात कृषी खात्यातर्फे नेमलेल्या कर्मचाऱयांकडून सदर पीक नोंदणी होणार आहे, अशी माहितीही पिराजे यांनी दिली.
पीक विमा योजनेस प्रारंभ
नेहमी प्रमाणे या हंगामातही प्रधानमंत्री पीक विमा योजनेस प्रारंभ झाला आहे. निपाणी विभागात सोयाबिन, तूर, मूग, उडीद या खरीप पिकांसाठी पीक विमा लागू झाला असून शेतकऱयांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी खात्यातर्फे करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीकाळात भरपाई मिळण्यासाठी पीक विमा आवश्यक ठरतो. मात्र गेल्या काही वर्षात पीक विम्याचे बदलले नियम पाहता निपाणी विभागात पीक विम्यास अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.