’काळे कायदे’ मागे घेऊन मोदी सरकारचे नमते : आप नेते अरविंद केजरीवाल यांची प्रतिक्रिया
प्रतिनिधी /पणजी
शेतकऱयांच्या लढय़ासमोर पंतप्रधानांना नमते घ्यावे लागणे हा लोकशाहीचा मोठा विजय असून तीन कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱयांना त्यांच्या प्रदीर्घ आणि अथक संघर्षाचे फळ मिळाले आहे, अशी प्रतिक्रिया दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे.
आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सुवर्ण दिवस असून 15 ऑगस्ट, 26 जानेवारी प्रमाणेच भारतीय इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. देशावर नेते नव्हे तर जनताच राज्य करते आणि लोकशाहीत सरकारला नेहमी जनतेचेच ऐकावे लागते, हे या शेतकऱयांनी सर्वांना दाखवून दिले आहे, असेही केजरीवाल म्हणाले.
शेतकऱयांना दहशतवादी, खलिस्तानी आणि देशद्रोही ठरवून त्यांच्या आंदोलनाला तडा देण्याचे सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले, पण स्वातंत्र्यसैनिकांप्रमाणेच शेतकरी लढले आणि जिंकलेही. तरीही यापूर्वीच हे कायदे मागे घेतले असते तर आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱयांचे प्राण वाचू शकले असते, असेही सांगून सर्व शहीद शेतकऱयांना त्यांनी वंदन केले.
या संघर्षाने संपूर्ण देश पुन्हा एकत्र केला
शेतकऱयांच्या अथक संघर्षापुढे केंद्र सरकारला नमते घ्यावे लागले आणि सर्व ‘काळे कायदे’ मागे घ्यावे लागले. हा केवळ शेतकऱयांचाच विजय नव्हे, तर संपूर्ण देशाला एकत्र आणणाऱया या संघर्षातून लोकशाहीनेही मोठा लढा जिंकला आहे. पक्ष कोणताही असो वा नेता, जनतेसमोर तुमचा मग्रूरपण चालणार नाही. या लढय़ात शेतकऱयांसह, मजूर, महिला, दुकानदार अशा सर्वांनी सहभाग घेतला. पंजाब असो की उत्तर प्रदेश, बंगाल, केरळ, संपूर्ण देश शेतकऱयांच्या पाठीशी उभा राहिला. देश-विदेशात राहणारे तमाम भारतीय एकत्र आले आणि त्यांनी मिळून आज इतिहास रचला. धर्म आणि जातीच्या रेषेच्या वरती ज्यांनी एकत्र येऊन तिन्ही कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरून ही लढाई लढली आणि अखेर आज केंद्र सरकारला त्यांच्यासमोर नमते घ्यावे लागले, असे केजरीवाल यांनी पुढे सांगितले.
कृषी आंदोलनातील शहीदांना केले वंदन
केजरीवाल पुढे म्हणाले, या आंदोलनात आपल्या 700 हून अधिक शेतकऱयांनी जीव गमावला. त्यामुळे 700 हून अधिक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. या सर्वाला सरकारची मग्रुरी कारणीभूत आहे. आधीच हे कायदे मागे घेतले असते तर हे सर्व टाळता आले असते. सर्वांचे प्राण वाचू शकले असते.