आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सल्ला : उचगाव कृषी रयत केंद्रातर्फे बी-बियाणे वाटप
वार्ताहर / उचगाव
कोरोना महामारी काळात लॉकडाऊन जारी असला तरी शेतीव्यवसाय काही थांबत नाही. शेतकरी बांधवांनी शेती व्यवसाय करतच रहा मात्र स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, असा सल्ला ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उचगाव येथील कृषी रयत संपर्क केंद्रामार्फत बी-बियाणे वाटप समारंभात दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उचगाव ग्रामपंचायतीचे अध्यक्ष जावेद जमादार होते.
बी-बियाणे वाटप कार्यक्रमप्रसंगी एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, ग्रामपंचायतच्या उपाध्यक्षा व तालुका पंचायतीच्या सदस्या मथुरा तेरसे, ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण तेरसे, एल. डी. चौगुले, योगिता देसाई, रुपा गोंधळी, अनुसया कोलकार, माजी सदस्य सुनील देसाई, शंकर गिरी, कृष्णा नावगेकर उपस्थित होते.
बियाणे वाटप कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व शेतकऱयांचे स्वागत असिस्टंट कृषी अधिकारी बेळगाव आर. बी. नाईक यांनी केले. यावेळी बियाणांच्या पोत्यांचे पूजन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करून शेतकऱयांना बियाणे वितरित करण्यात आली. एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. आता खरीप हंगामाला सुरुवात होत असून शेतकऱयांना बियाणांची आवश्यकता आहे. यासाठी वेळेत बी-बियाणे रयत संपर्क केंद्रामध्ये उपलब्ध करण्यात आली असून त्याचा शेतकऱयांनी उपयोग करून घ्यावा, असे बी. आर. नायकर यांनी सांगितले. यावेळी उचगाव रयत संपर्क केंद्राचे कृषी अधिकारी अरुण कापसी, साहाय्यक कृषी अधिकारी एस. टी. कांबळे, मल्लेश नाईक, भाग्यश्री पाटील उपस्थित होते.
या कृषी संपर्क केंद्रामार्फत आयोजित करण्यात आलेल्या बी-बियाणे वाटप कार्यक्रमाला कृषी रयत संपर्क केंद्राच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. त्या सर्वांना रयत संपर्क केंद्रातून बियाणाचे वितरण करण्यात आले. तसेच या कृषी रयत संपर्क केंद्राच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱयांनी खते, बी-बियाणे सध्या उपलब्ध असून त्याचा शेतीसाठी लाभ करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. अरुण कापसी यांनी आभार मानले.