भारतीय कृषक समाज संघटनेचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
उत्तरप्रदेशमध्ये आंदोलनावेळी शेतकऱयांवर वाहन चालवून चार जणांना चिरडले. ही घटना अत्यंत धक्कादायक आहे. शेतकऱयांची जी अवस्था भाजप सरकारने केली आहे ती अत्यंत वाईट आहे. अशाप्रकारे शेतकऱयांवर वाहन चालविणे योग्य नाही. तेव्हा संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय कृषक समाज संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या टेनी या गावात उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्या कार्यक्रमावेळी हा गेंधळ उडाला. उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले. त्यावेळी भाजप कार्यकर्ते, पोलीस आणि शेतकऱयांमध्ये झटापट झाली. त्यामध्ये शेतकऱयांचा मृत्यू झाला आहे. अक्षरशः शेतकऱयांच्या अंगावर वाहने चालविण्यात आली. जसे काही देशामध्ये हुकुमशाही असल्याचा थाट भाजपने मांडला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
संबंधितांवर कारवाई केली नाही तर संपूर्ण देशभर शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सिद्धगौडा मोदगी, संतोष कामत, सुभाष पाटील, एन. बी. कुरबर, बी. एन. हनमट्टी, स्वाभीमानी संघटनेच्या महिला अध्यक्षा शिवलीला मिसाळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.