खत-रसायन मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांची माहिती
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गाच्या काळातही कृषी क्षेत्राने भारतीय अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली आहे. इतर क्षेत्रांचा विकासदर कमी झाला असला तरी कृषी क्षेत्राचा विकासदर वाढल्याचे दिसून येत आहे. कृषी क्षेत्रातील ही तेजी कायम टिकविण्यासाठी आता रब्बी हंगामातही शेतकऱयांना शेतीपूरक वस्तूंचा मुबलक पुरवठा करण्यात येणार असल्याचे खत आणि रसायन मंत्री डी. व्ही. सदानंदगौडा यांनी नुतकेच जाहीर केले. शेतकऱयांना खत आणि औषधांचा योग्य पुरवठा करण्यासाठी सरकारने उपाययोजना हाती घेतल्या असून कंपन्यांशीही उत्पादनाबाबत बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खत आणि रसायन मंत्रालयाने नुकताच देशातील खताच्या साठय़ाचा आढावा घेतला. गेल्यावर्षी खताचे उत्पादन, आयात आणि देशांतर्गत वाहतुकीवर परिणाम होणार नाही याची काळजी घेण्यात आल्त्यामुळे कृषिक्षेत्राला खताची टंचाई जाणवली नाही. त्याच धर्तीवर यंदाही खतांचा योग्य पुरवठा करण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहेत. तसेच दरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्नही केला आहे. गेल्या आठवडय़ात काही खत कंपन्यांनी खताचे दर आंतरराष्ट्रीय दराप्रमाणे वाढविल्यानंतर सरकारने हस्तक्षेप करून खतांचे दर वाढवू नका असे सांगितले होते.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये किती खत लागणार आहे याचा अंदाज मंत्रालयाने घेतला असून या राज्यात एवढे खत योग्य वेळी उपलब्ध होईल याची काळजी घेण्यात येत आहे. तसेच सध्याच्या कोरोना संसर्ग, विविध राज्यांमधील कोरोना कर्फ्यू आणि कठोर नियमांचा खत पुरवठय़ावर परिणाम होऊ देणार नसल्याची स्पष्टोक्तीही देण्यात आली आहे.