काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत, मुठभर उद्योजकांसाठी शेतकऱ्यांवर अन्याय केल्याचा आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
केंद्र सरकारने मुठभर उद्योजकांच्या हितासाठी कृषी कायदे करून शेतकऱयांवर अन्याय केला आहे. अन्नदात्याची अशी दुरावस्था आजतागायत झाली नाही. भाजपच्या नेत्यांकडून शेतकऱ्यांना देशद्रोही, खलिस्तानी म्हणून संबोधले जात असून त्यांचा संबंध चीन-पाकिस्तानसोबत जोडला जात आहे. त्याचा निषेध करतो. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणतात की मुठभर शेतकऱ्यांसाठी कृषी कायदे बदलायचे काय? पण शेतकरी मुठभर नसून आंदोलनामध्ये 60 जणांनी बलिदान दिले आहे. शेतकऱयांची ही वज्रमुठ पंतप्रधान नरेंद मोदी यांच्यावर प्रहार करेल, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.
जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये सावंत यांनी कृषी कायदे व औरंगाबाद नामांतराच्या मुद्याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची विचारसरणी प्रतिगामी आहे. त्यामुळेच ते शेतकऱ्यांवर चुकीचे आरोप करत आहेत.
औरंगाबाद शहराला संभाजीनगर नाव देण्याच्या मुद्यावरून सुरु असलेल्या राजकारणाला काँग्रेसचा विरोध आहे. नामांतर करण्याचा विषय हा सत्तेतील तिन्ही पक्षाच्या किमान समान कार्यक्रमामध्ये नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काँग्रेसला प्रचंड आदर आहे. म्हणूनच औरंगाबाद विमानतळाला संभाजीनगर असे नामांतर करण्यासाठी दोन्ही काँग्रेससह शिवसेनेने परवानगी दिली आहे. पण आता औरंगाबाद शहराच्या नामांतरावरून जे विवाद सुरु आहेत, ते चुकीचे आहे. महापुरूष हे त्यांच्या कर्तृत्वावरून आणि विचारावरून ओळखले जातात. त्यामुळे एखाद्या शहराला त्यांचे नाव ठेवण्यावरून राजकारण करणे चुकीचे आहे. औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण सुरु आहे. पण नामांतराच्या मुद्यावरून सरकारला कोणताही धोका नाही, अशी स्पष्टोक्ती सचिन सावंत यांनी केली. यावेळी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी महापौर निलोफर आजरेकर आदी उपस्थित होते.