ऑनलाईन टीम / मुंबई :
संसदेत बहुमताने मंजूर करण्यात आलेल्या तीन कृषी विधेयकाच्या निषेधार्थ शेतकरी संघटनांनी आज ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. अखिल भारतीय किसान सभा व संलग्न शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पाठिंबा दिला आहे. अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी ही माहिती दिली.
केंद्र सरकारने संसदेत मंजूर केलेल्या विधेयकांमधून शेतकऱ्यांचा हमीभाव नाकारणारी, बाजार समित्यांचे अस्तित्व पुसणारी व शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या दावणीला बांधणारी प्रक्रिया या कायद्याच्या रूपाने पुढे रेटली आहे. त्यामुळे या विधेयकांच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आला आहे.
पंजाब हरियाणात आंदोलनाचा प्रभाव अधिक
पंजाब आणि हरियाणामध्ये या आंदोलनाचा अधिक प्रभाव दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून रस्त्यावर कामगिरी करणारे पंजाबचे शेतकरी गुरुवारी रेल्वे रुळावर बसले आहेत. ते तीन दिवस आंदोलन करणार आहेत. रेल्वे रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने शनिवारपर्यंत 20 विशेष गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत आणि गंतव्य स्थानासमोर पाच गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. हरियाणात शेतकऱ्यांनी महामार्ग जाम करण्याचा इशारा दिला आहे. यूपीत सपाने किसान कार्फ बनवले आहे.
पंजाबमध्ये किसान मजदूर संघर्ष समितीने अमृतसर आणि फिरोजपूरमध्ये रेल्वे रुळांवर कब्जा केला आहे. पंजाबमधील 31 शेतकरी संघटनांनी आज पूर्ण बंद ची घोषणा केली आहे. प्रस्तावित भारत बंददरम्यान हरियाणातील बाजारपेठा बंद राहणार आहेत. प्रमुख मार्ग आणि रेल्वे मार्गांवर कोंडी करण्याचा इशारा अखिल भारतीय शेतकरी संघर्ष समन्वय समितीने दिला आहे.