शेतकऱ्यांच्या प्रमुख चार मागण्यासाठी १५ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
हेरले/प्रतिनिधी
हेरले गावातून जाणाऱ्या रत्नागिरी सोलापूर महामार्गात जाणाऱ्या रस्त्यासाठी सरकारने कवडीमोल किंमत देऊ केली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांना ही किंमत मान्य नाही. सरकारने दिलेल्या किमतीपेक्षा जादा दराने जमिनीचे व्यवहार झाले आहेत. सरकार कवडीमोल किमतीने जमिनी घेणार असेल तर शेतकरी कदापी मान्य करणार नाही. शेतकऱ्यांच्या जाणाऱ्या जमिनीतून सरकार शंभर पट टोल वसूल करून वाहतुकदारांची लूट करणार आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळाल्याशिवाय एक इंच सुद्धा जमीन मिळणार नाही.
शेतकऱ्यांच्या वर सरकारने जबरदस्ती केली तर शेतकऱ्यांचा हिसका दाखवू, प्रसंगी सुप्रीम कोर्टात जाऊ, असे प्रतिपादन माजी खासदार राजु शेट्टी यांनी केले. हेरले ता.हातकणंगले येथे हेरले, वडगाव, टोप, नागाव, माले, चोकाक येथील रत्नागिरी सोलापूर महामार्गात जमीनी गेलेल्या नुकसान ग्रस्त शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी अशोक मुंडे होते.
नुकसानग्रस्त शेतकरी राजेंद्र पाटील म्हणाले, सरकारने या संपूर्ण महामार्गाची पारदर्शक माहिती शेतकऱ्यांना दिलेली नाही. समृद्धी महामार्गातील शेतकऱ्यांना एक न्याय व रत्नागिरी सोलापूर महामार्गात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय दिला आहे. हे शेतकऱ्यांना कदापीही मान्य नाही.
माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील म्हणाले, सरकारने शेतकऱ्यांना दिलेली जमिनीची किमत मान्य नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रमुख चार मागण्यासाठी १५ तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे त्यासाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे.
यावेळी वडगाव माजी उपसरपंच रावसो चौगुले, सदाशिव मगदूम, माले माजी उपसरपंच सुनील कांबळे, धनंजय टारे,राहुल शेटे, रमेश कांबळे, राजगोंडा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जयकुमार कोले,महंमद खतीब यांनी मनोगते व्यक्त केली.