प्रतिनिधी / सातारा :
दिल्ली येथे शेतकऱ्यांच्या नावावर सुरु असलेल्या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घ्यावे. पंतप्रधानांनी ते वादग्रस्त कायदे मागे घेतले आहेत. तरीही या आंदोलनाचे नेते जर हट्ट करणार असतील तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, असे मत केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. दरम्यान, महाविकास आघाडीचे सरकार येत्या काही दिवसात पडेल, असेही त्यांनी भाकित केले.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आठवले म्हणाले,
शेतकऱ्यांच्या नावावर दिल्लीत आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन गेले एक वर्ष झाले सुरु आहे. शेतकऱ्यांच्या हिताचे कायदे असताना ते कायदे मागे घेण्याची हट्टवादी भूमिका घेवून ते आंदोलन करत आहेत. आम्हीही आंदोलने केली आहेत. त्या आंदोलनात पोलिसांच्या लाठय़ा खाल्या आहेत. येथे मात्र या आंदोलनकर्त्यांना बसण्यास परवानगी दिली आहे. पंतप्रधानांनी ते कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. कायदेशीर मार्गाने बिल मागे घेतले जाईल. तोपर्यंत आंदोलन मागे घ्यावे. जर आंदोलनकर्त्या नेत्यांनी आंदोलन मागे घेतले नाही तर त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आंदोलन सुरु आहे. त्या आंदोलनाला रिपाइंचा पाठींबा आहे. याकरता राज्य सरकारने समिती नेमली आहे. त्या समितीने लवकरच निर्णय घेवून हा प्रश्न निकालात काढावा, राज्य सरकारमध्ये महामंडळाचे विलिनीकरण करावे. राज्यातल्या ज्या एसटी कर्मचाऱयांनी आत्महत्या केल्या. त्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारने मदत करावी. त्यांच्या वारसांना एसटीमध्ये नोकरी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोकराव गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.