वार्ताहर / उचगांव
शेतकऱ्यांशी मराठीतून संभाषण करावे, ग्राहकांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी, शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रलंबित कामांचा निपटारा करावा अशी मागणी महाराष्ट्र बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक संदीपकुमार चौरसिया यांच्याकडे करवीर तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली. शिष्टमंडळाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख संजय पवार, तालुकाप्रमुख राजू यादव व पोपट दांगट यांनी केले.
करवीर पुर्व भागासाठी गडमुडशिंगी येथे एकमेव महाराष्ट्र बँकेची शाखा आहे. या बँकेत अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्ग अत्यल्प असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होते. तर नवीन व जुनी कर्ज प्रकरणे अनेक दिवसांपासून मंजूर अगर नुतनीकरण झालेली नाहीत. जबाबदार अधिकारी नसल्यामुळे ही सर्व कामे प्रलंबित आहेत. त्याचबरोबर बँकेकडून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली जात नाही. बेजबाबदार उत्तरे दिली जातात. शेतकरी व सर्वसामान्य नागरिक, महिला, जेष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या शासकीय व निमशासकीय योजना त्वरित मंजूर करून दिल्या जात नाहीत. शासनाच्या योजना शेतकरी व जनतेपर्यंत पोहचवा, असे जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले. तर उपतालुकाप्रमुख पोपट दांगट म्हणाले की, कर्मचारी वर्ग तात्काळ भरून शेतकऱ्यांची गैरसोय टाळा.
बँकेचा स्थानिक ग्राहक शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना अन्य कोणती भाषा अवगत नसते. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मराठीतुन बोलायला हवे. मात्र, बँकेच्या शाखेत ग्राहकांना अवगत नसलेली भाषा बोलली जाते, हे गैर आहे. कर्मचारी व अधिकारी वर्गास मराठीमधून संभाषण करण्याच्या सूचना द्याव्यात, असे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले. तसे न झाल्यास करवीर शिवसेनेच्यावतीने बँकेस टाळे ठोकण्यात येईल, याची नोंद घ्यावी. दरम्यान, निवेदन स्वीकारल्यानंतर संदिपकुमार चौरसिया म्हणाले की, लवकरात लवकर आपल्या मागण्यांची पूर्तता करु व बँकेची कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घेऊ.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उपतालुकाप्रमुख पोपट दांगट, गडमुडशिगींचे सरपंच जितेंद्र यशवंत, कृष्णात रेवडे, दिपक पाटील, संदिप दळवी, संभाजी पाटील, मंजित माने, सतिश गिऱोले, बाबुराव पाटील, सागर पाटील, प्रफुल्ल घोरपडे, महादेव खोचगे, संदीप पाटील, सुभाष पाटील उपस्थित होते.