ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघटनांनी 8 डिसेंबरला पुकारलेल्या ‘भारत बंद’ला देशातील 51 ट्रान्सपोर्ट युनियनने पाठिंबा दिला आहे.
इंडियन टुरिस्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशन (ITTA) आणि दिल्ली गुड्स ट्रान्सपोर्ट असोसिएशनने हा पाठिंबा दर्शवला आहे. ITTA चे अध्यक्ष सतीश शेरावत म्हणाले, ‘शेती आणि ट्रान्सपोर्ट ही एकाच बापाची दोन मुले आहेत. त्यामुळे आमच्या 51 संघटनांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.’ यापूर्वी 10 ट्रेड्स युनियनने देखील शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, तिन्ही कृषी सुधारणा कायदे मागे घ्या, शेतमालास किमान आधारभूत मूल्य लागू असलेला कायदा करा, या प्रमुख मागण्यांसाठी मागील दहा दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरियाणासह अन्य राज्यांच्या शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. शेतकरी कृषी सुधारणा कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. सरकारसोबतच्या पाच बैठका निष्फळ ठरल्याने शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली आहे.