जवाहर साखर कारखान्याचे निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठीच-अध्यक्ष प्रकाश आवाडे
इचलकरंजी / प्रतिनिधी
जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याने स्थापनेपासून शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. राज्य शासनाने महाराष्ट्र वीज मंडळाच्या माध्यमातून ज्या सभासद शेतकऱ्यांची थकबाकी आहे ती मिळवून देण्यासंदर्भात विनंती केली आहे. त्यानुसार कारखान्याच्या एक्झिक्यूटिव्ह बोर्डाने निर्णय घेतला आहे. परंतु शेतकरी संघटनाची काही मंडळी राजकीय द्वेषातून जवाहर कारखाना जबरदस्तीने सभासद शेतकऱ्यांची रक्कम कपात करत असल्याचा अफवा पसरवत असल्याचा आरोप जवाहर कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रकाश आवाडे यांनी केला.
कारखान्याने तीन ते पाच हजार रुपये पर्यंतच्याच रकमा कपात करून कारखान्याकडे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र जो शेतकरी माझी काहीही थकबाकी नाही असा अर्ज करेल त्याची रक्कम त्याला परत दिली जाईल. शिवाय जे शेतकरी थकबाकी रक्कम कपात करण्यास संमती देईल त्याचीच रक्कम कपात केली जाईल. अन्यथा ती रक्कम शेतकऱ्यास परत दिली जाईल. परंतु काही मंडळी माहिती न घेता वेगळाच विषय करत आहेत. शेतकऱ्याचे हित कसे जोपासायचे हे जवाहरला कोणाकडून शिकण्याची गरज नाही. शेतकऱ्यांसाठी कारखाना जन्माला घातला आहे. शेतकरी हिताचे अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी प्रयत्न करा, आम्ही तुमच्यासोबत येऊ. पण राजकीय द्वेषातून जवाहर कारखान्याची बदनामी करू नका. शिवाय शेतकरी सभासदांनी अशा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन अध्यक्ष आ. प्रकाशआण्णा आवाडे यांनी केले.