प्रतिनिधी / सोलापूर
देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या शेतकऱ्याला हे जनता विरोधी सरकार तीन काळे कायदे पारित करून धोक्यात आणले आहे. त्यासाठी सर्व शेतकरी संघटनांनी सरकारच्या विरोधात 8 डिसेंबरला भारत बंद करण्याची हाक दिली आहे. त्या अनुषंगाने सोलापूरातील सर्व उद्योजक, व्यापारी, कामगार कर्मचारी, किरकोळ विक्रेते, फेरीवाले या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने मंगळवारी 8 डिसेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चात सामील व्हा असे आवाहन आडम मास्तर यांनी केले.
रविवार दिनांक 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने माकपचे राज्यसचिव माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध जनवादी संघटनाचे प्रमुख प्रतिनिधी यांची अत्यंत तातडीची बैठक दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे बोलवण्यात आली.
या बैठकीत भारत बंद यशस्वी होण्यासाठी आखणी करण्यात आली. मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंगळवार 8 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता दत्त नगर लालबावटा कार्यालय येथून सुरुवात होऊन हा मोर्चा आंध्र दत्त चौक मार्गे भद्रावती पेठ, जोडबसवन्ना चौक, मार्कंडेय चौक, साखर पेठ, सोमवार पेठ, समाचार चौक, माणिक चौक, नवी पेठ, मेकॅनिक चौक, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, प.मंगळवार पेठ क्रांती चौक येथे समारोप करून मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत होईल.
यावेळी पुढे बोलताना आडम म्हणाले की, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध तीन कायदे मंजूर केले आहेत. त्यांच्या विरोधात देशभरातील ५०० पेक्षा जास्त शेतकरी संघटनांनी एकत्रित येऊन दि. २६ नोव्हेंबर २०२० पासून दिल्ली घेरावाची घोषणा करून दोन प्रमुख महामार्ग रोखून धरले आहेत. त्यांच्यावर बळाचा वापर करून त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न सरकर करत आहे.
या शेतकरी कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होणार असून साठेबाजार व सट्टाबाजाराला मात्र आळा घातलेला नाही. शेती व्यवसाय पूर्णपणे बड्या कॉर्पोरेट कंपन्याच्या हवाली करण्यचा हा डाव आहे. तर शेती मालाला हमीभाव देण्याएवजी सरकर सर्व जबाबदारीतून मुक्त होण्याच्या व शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा पवित्र्यात आहे.
हा हल्ला फक्त शेतकऱ्यावर नसून आपल्या अन्नदात्यावर आहे. याबरोबरच कामगार, व्यापारी, किरकोळ विक्रेते, शेतमजूर, महिला, युवक व विद्यार्थी या सर्वांवर अये हल्ले होत आहेत. म्हणून देशातील सर्व शेतकरी-कामगार व सामाजिक संघटनानी एकत्रित येऊन मंगळवार दि. ८ डिसेंबर २०२० रोजी भारत बंद ची हाक दिली आहे. तरी सर्व संघटना / असोसिएशन / मंडळ / संस्था यांच्या वतीने पाठींबा देऊन यात सक्रीय सहभाग नोंदवावे असे आवाहन केले.
या बैठकीस माकप चे जिल्हा सचिव अॅड एम.एच. शेख, नसीमा शेख, नलिनीताई कलबुर्गी, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी, युसूफ मेजर, रंगप्पा मरेड्डी,प्रा.अब्राहम कुमार, शेवंता देशमुख, म. हानिफ सातखेड, सलीम मुल्ला, सलीम पटेल, विल्यम ससाणे, बापू साबळे,दाऊद शेख,शंकर म्हेत्रे,बाबू कोकणे,अकील शेख, अशोक बल्ला,लिंगव्वा सोलापूरे, शकुंतला पानिभाते,फातिमा बेग, जावेद सगरी, दत्ता चव्हाण,सनी शेट्टी, विजय हरसुरे, श्रीनिवास गड्डम आदी उपस्थित होते.