ऑनलाईन टीम / मुंबई :
सध्या शेतकऱ्यांचा पेरणीचा काळ आहे. यासाठी त्यांना पीक कर्जाची आवश्यकता असताना अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याची बाब समोर येत आहे. ही बाब अतिशय गंभीर असून ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देणार नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा गंभीर इशारा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
पुढे ते म्हणाले, शेतकऱ्यांना सुलभतेने कर्ज मिळावे यासाठी राज्य शासनाच्यावतीने विशेष आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. असे असतानाही अनेक राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे.
ज्या बँका पीक कर्ज देत नाही त्यांना वारंवार सूचना सुद्धा करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या बँकांची तक्रार जिल्हाधिकारी यांनी दिली तर अडचणीच्या काळात शेतकऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही अनिल देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.