ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
लखीमपूर खेरी येथे शेतकरी आंदोलनादरम्यान केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या एसयूव्हीने शेतकऱ्यांना चिरडले हेते. 3 ऑक्टोबरला घडलेल्या या घटनेत चार शेतकऱ्यांसह 8 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान एसआयटीने शेतकऱ्यांवर गाडी चढवणे, हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले आहे.
शेतकऱ्यांना चिरडणारी एसयुव्ही अजय मिश्रा यांची होती. मिश्रा यांचा मुलगा आशिष या गाडीत होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आरोपांनुसार आशिष मिश्रासह 14 आरोपींविरुद्ध कलम 279, 338, 304 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. दरम्यान, या प्रकरणाच्या तपासादरम्यान एसआयटीने मोठा खुलासा केला आहे. शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणे हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. त्यामुळे या आरोपींवर खुनाचा प्रयत्न आणि इतर आरोपही जोडले जावेत, अशी एसआयटीची इच्छा आहे. त्यामुळे एसआयटीने आरोपींवर कलम 302, 307, 326, 34, 120 147, 148, 149, 3/25/30 अन्वये खटला चालविण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे.