ऑनलाईन टीम / लखनऊ :
लखीमपूर खेरी येथे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडणारी ‘ती’ कार आमचीच असल्याची कबुली केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांनी दिली आहे. मात्र, यावेळी माझा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित नव्हता. तो रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत दुसऱ्या कार्यक्रमाचे नियोजन करत होता, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.
मिश्रा म्हणाले, लखीमपूर हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांना चिरडणारी ती थार कार आमचीच आहे. मात्र, त्यावेळी माझा मुलगा तिथे उपस्थित नव्हता. सकाळी 11 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत तो दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करत होता. त्या ठिकाणी हजारो लोक होते. त्याठिकाणचा व्हिडिओ आणि फोटो उपलब्ध आहेत. तसेच आशिष मिश्राचे लोकेशन आणि फोन रेकॉर्ड तुम्ही तपासू शकता.
दरम्यान, आंदोलनावेळी कारवर हल्ला झाला. यात चालक जखमी झाला. यानंतर, वाहन अनियंत्रित झाले आणि तिथल्या लोकांच्या अंगावरून गेले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी माझी मागणी असल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे.