तरुण भारत संवाद प्रतिनिधी / बार्शी
शेतकऱ्यांना पीक कर्ज प्राधान्याने द्यावे अशी केंद्र आणि राज्य शासनाची भूमिका असताना सुद्धा काही राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात दिरंगाई आणि दुर्लक्षपणा केल्याचे काल दिनांक 6 जुलै रोजी उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लीड बँक बँक ऑफ महाराष्ट्र या ठिकाणी घेतलेल्या सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या मॅनेजर यांच्या बैठकीत उघड झाले.
यावेळी लीड बँक मॅनेजर सोनवणे यांना खासदार ओमराजे यांनी मांडलेले मुद्दे याविषयी समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत आणि बार्शी तालुक्यातील सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांचा शेतकऱ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन वीचित्र दिसला असल्याने खासदार ओमराजे चांगलेच संतापले आणि सर्व उपस्थित मॅनेजर यांना खडे बोल सुनावले.
यावेळी ‘दै. तरुण भारत संवाद’ शी बोलताना खासदार ओमराजे यांनी सांगितले की, बार्शी तालुका हा सर्वात मोठा तालुका आहे. या तालुक्यासाठी फक्त एकशे आठ कोटी इतकेच पीक कर्ज टार्गेट रक्कम आलेली आहे. हे खूप कमी आहेत तशी टारगेट रक्कम वाढवण्याची सूचना लिड बँक मॅनेजर सोनवणे यांना केलेली आहे. ते नाबार्ड अधिकारी यांच्याशी बोलून लवकरच रक्कम वाढवतील, तसेच बार्शी तालुक्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांना पीककर्ज घेताना अडचणी येत आहेत. त्यात सत्तर वर्षावरील व्यक्ती असतील किंवा ज्यांचे सातबारे एकत्रित आहेत अशांना अडचणी आहेत. त्या सूचना केल्या आहेत की कर्ज द्यायच असेल तर इतर लोकांना सहकर्जदार किंवा एखाद्या स्टॅम्प पेपरवर त्यांची संमती घ्या. नो ड्युज बाबतही तक्रारी आहेत. यासाठी शेतकऱ्यांना इतर बँकापर्यंत फिरू देऊ नका. नो ड्युज बाबत एकत्रित प्रणाली करा असे आदेश त्यांनी आज दिले असल्याचे सांगितले.
तसेच स्केल ऑफ फायनान्सबाबत त्यांनी मार्गदर्शन केले की ज्या पिकाला जेवढी रक्कम आहे तेवढी दिली पाहिजे असेही सांगितले. त्याचबरोबर त्यांनी खूप दुःख विशद केले की कर्जमाफीची रक्कम किती आली आहे हे विचारले असता एकाही बँक मॅनेजरला रक्कम सांगता आली नाही आणि तीच रक्कम त्याच तालुक्यांमध्ये परत कर्जरूपाने द्यायची आहे असे असताना सुद्धा वाटप होत नाही. त्याच्यामुळे कोरोनाच्या काळात संकटात सापडलेला शेतकरी अजून या बँकांच्या गलथान कारभारामुळे संकटात आहे. याविषयी खासदार कार्यालय स्वतः लक्ष घालणार असून लवकरच शेतकऱ्यांना भरपूर कर्ज उपलब्ध होईल असर्व विश्वास त्यांनी ‘दै. तरुण भारत संवाद’शी बोलताना दिला.
शासन आदेशानुसार शेतकऱ्यांना कर्ज मागण्यासाठी बँकेत जायची गरज नाही आपल्या गावांमध्ये गट सचिव यांनी सामूहिकपणे अर्ज गोळा करून ते बँकेत जमा करायचे आहेत आणि बँकेने मंजुरी दिल्यानंतर फक्त सहीसाठी एकच दिवस शेतकऱ्यांना बँकेत बोलवायचे आहे असे स्पष्ट शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे गटसचिव यांनी तात्काळ आपापल्या गावातील शेतकऱ्यांची पिक कर्जाची अर्ज भरून घ्यावेत असे स्पष्ट आदेश खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिले आहेत .आणि दत्तक बँक हा प्रकार गैरलागू आहे. दत्तक बँक हे फक्त शासनाने दिलेल्या विविध योजना किंवा महामंडळाची कर्ज याच्यासाठी आहे . शेतकऱ्यांना दत्तक बँक लागू नाही शेतकरी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत जाऊन पीक कर्ज घेऊ शकतो.