प्रतिनिधी / जयसिंगपूर
कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमध्ये देशभरात लॉकडाऊन अजूनही सुरूच आहे, लॉकडाऊन आणखी किती दिवस सुरू राहील हे सद्यस्थितीला सांगणे कठीण आहे पण लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून निरंतर सुरू असलेला एकमेव व्यवसाय तो म्हणजे शेती. त्यामुळे शेतकरी आणि शेतीला लागणाऱ्या सर्व गरजा पूर्ण करण्यासारखी सरकार कटिबद्ध आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा जाणवणार नाही अशी ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी अब्दुलाट येथे बोलताना दिली.
अब्दुल लाट येथील काही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना रासायनिक व सेंद्रिय खतांचे वाटप करण्यात आले. यावेळी मंत्री यड्रावकर बोलत होते, खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा तुटवडा भासू नये म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे उपविभागीय कृषी अधिकारी मकरंद कुलकर्णी व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी विजय नायकवडे यांच्या शेतावर सेंद्रिय खत तर विठ्ठल पाटील व संजय चौगुले यांच्या शेतावर जाऊन रासायनिक खतांचे वाटप करण्यात आले. यानंतर सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी व सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक चैतन्य शिक्षण समूहाच्या प्रांगणात घेण्यात आले.
मंडल कृषी अधिकारी निरंजन देसाई, डॉ. दशरथ काळे, विद्याधर कुलकर्णी, कल्लाप्पा कुमटोळे, संजय परीट, एस. के. पाटील, कॉम्रेड आप्पा पाटील, दादासो सावगावे, महावीर सावगावे, कल्पना कुमटोळे,आप्पासो चौगुले कृषी पर्यवेक्षक प्रकाश वठारे कृषी सहाय्यक प्रदीप कोळी यांच्यासह शेतकरी यावेळी उपस्थित होते.