ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर मागील 4 महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी आज देशव्यापी भारत बंदची हाक दिली आहे. सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत 12 तासांचा हा बंद असणार आहे. या बंदमध्ये सहभागी होण्याची शेतकऱ्यांना सक्ती नसल्याचे संयुक्त किसान मोर्चाच्या शेतकरी नेत्यांनी म्हटले आहे.
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर गाझीपूर सीमेवरील राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी आज सकाळी रोखला होता.
दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वेवर बॅरिकेट्स
शेतकऱ्यांनी सकाळी 6 वाजता दिल्ली-मेरठ एक्सप्रेस वेवरील दिल्लीहून गाझियाबादला जाणाऱया लेनवर बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला. त्याठिकाणी शेतकरी ढोलकी आणि घंटा वाजवून होळीचा आनंद लुटत आहेत. शेतकऱ्यांनी दिल्ली ते कौशंबी ही लेनही बॅरिकेट्स लावून रोखली आहे.
पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे ट्रॅक रोखला
भारत बंदच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील शेतकऱ्यांनी अमृतसरमध्ये रेल्वे ट्रॅक रोखला आहे. तसेच गुरुदासपुरमध्ये दुकाने बंद ठेवली आहेत.
रोहतक-पानिपत महामार्गावर चक्काजाम
शेतकऱयांनी रुखीतील रोहतक-पानिपत महामार्गावर चक्काजाम केला आहे. तसेच ढकोली-जिरखपूर रोड बंद केला आहे.