प्रतिनिधी / औंध
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन 2020- 21 मध्ये अत्यल्प, अल्प भूधारक शेतकऱ्यांनी फळझाडांची लागवड करावी आणि 100 टक्के अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अरुण जाधव यांनी केले. त्रिमली ता खटाव येथे शेतकरी अमर जाधव यांच्या शेतात आंबा रोपे घनलागवड क्षेत्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मंडल कृषी अधिकारी अक्षय सावंत कृषी पर्यवेक्षक विजय वसव कृषी सहाय्यक एम एम गायकवाड एमडी मदने उपसरपंच संजय येवले संदीप येवले भाग्यश्री नामदार हर्षद घाडगे उपस्थित होते.
जाधव म्हणाले की आंबा घन लागवड, चिकू कलम ,पेरू कलमे डाळिंब, नारळ ,सिताफळ रोपे, सीताफळ, आवळा कलमे ,आवळा रोपे शेवगा जांभूळ रोपे इत्यादी फळझाडांची सलग क्षेत्रावर किंवा शेत बांधावर लागवड करावी. शंभर टक्के अनुदानाचा लाभ या योजनेअंतर्गत वरील फळपिकांना अनुदान देण्यात येतो. शेतकऱ्यांनी लागवड करताना कलमे रोपे ही शासनमान्यता नर्सरीतूनच घ्यावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, खाते उतारा ,आधार कार्ड ,बँक पासबुक व जॉब कार्ड इत्यादी कागदपत्रांची पूर्तता आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याकडे करावी असे आवाहन त्यांनी केले.