गोकाक तालुक्यातील घटनेने हळहळ, मृत बालके 6 वर्षांच्या आतील
प्रतिनिधी/ बेळगाव
शेततळय़ात पडलेला मोबाईल काढण्याच्या प्रयत्नात बुडून चार मुलांचा मृत्यू झाला आहे. गोकाक तालुक्यातील अजनकट्टी येथे शनिवारी दुपारी ही घटना घडली असून गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी शनिवारी रात्री या घटनेसंबंधी माहिती दिली. भागव्वा करेप्पा जक्कण्णवर (वय 6), तायम्मा उर्फ सुप्रीत करेप्पा जक्कण्णवर (वय 5), माळप्पा करेप्पा जक्कण्णवर (वय 4), राजश्री करेप्पा जक्कण्णवर (वय अडीच वर्षे) अशी त्या भावंडांची नावे आहेत.
करेप्पा व महादेवी या दाम्पत्याला चार अपत्ये होती. चारही मुलांना घेऊन हे गावात राहात होते. आजनकट्टी गावापासून अर्धा कि.मी. वर असलेल्या शेतवडीतील घरात करेप्पाचे आईवडील राहतात. रोज करेप्पा व त्याची पत्नी मुलांना घेऊन शेताला जाऊन येतात. नेहमीप्रमाणे शनिवारी हे दाम्पत्य आपल्या मुलांसमवेत शेतवडीत गेले होते. दुपारी चारही मुले शेततळय़ाजवळ खेळत होती. त्यावेळी करेप्पा पिकाला पाणी पाजण्यासाठी आणखी एका शेतवडीत गेला. त्याची पत्नी महादेवी मुलांना तेथेच सोडून गावातील घरात गेली. तिची तब्येत बरी नव्हती. त्यामुळे दवाखान्याला जाण्यासाठी आपल्या चारही मुलांना शेतात सोडून ती गावाकडे गेली होती.
दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास त्या मुलांची आजी लक्कव्वाने भागव्वाला तळय़ात पडलेले पाहिले. तिने एकच आरडाओरड केली. त्यामुळे शेजारी व नातेवाईक घटनास्थळी धावले. भागव्वाला पाण्याबाहेर काढण्यात आले. आणखी तिन मुलेही तेथे दिसेनासे झाले. त्यावेळी तेही पाण्यात बुडाल्याचे उघडकीस आले. चारही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. माळाप्पाच्या हातातील मोबाईलही तळय़ात सापडला आहे.