विरोध करणाऱया शेतकऱयांची आक्रमक भूमिका : एकदा रद्द केलेली आयआयटी त्याच जमिनीत पुन्हा आणण्याचे प्रयोजन काय ?, प्रकल्पाच्या नियोजित स्थळी शेतजमिनीत पत्रकार परिषद, महिलांची लक्षणीय उपस्थिती
प्रतिनिधी / सांगे
सांगे-कोठार्ली येथील नियोजित आयआयटीच्या स्थळी शेतकऱयांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन कोणत्याही परिस्थितीत शेती नष्ट करून आयआयटी होऊ देणार नाही, असा निर्धार बोलून दाखविला. आम्ही पिढय़ान्पिढय़ा येथे शेती करत आलो आहोत. वेळेप्रसंगी मेलो तरी चालेल, पण शेतीची जमीन आयआयटीसाठी देणार नाही, असा पवित्रा या शेतकऱयांनी घेतला. एकदा या जागेवरून रद्द केलेली आयआयटी पुन्हा त्याच जागेत आणण्याचे प्रयोजन काय, असा सवाल त्यांनी केला.
आम्ही आमच्या जमिनी देणार नाही. भले कोणत्याही थराला जावे लागले, तरी चालेल, असा इशारा देत प्रकल्पाच्या विरोधात प्रत्यक्ष शेतजमिनीत निदर्शने करण्यात आली आणि उपस्थित महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. आयआयटीसंदर्भात 17 जुलै रोजी शेतकऱयांनी बैठकीचे आयोजन केले होते. पण ही बैठक सुरू होताच आयआयटी समर्थकांनी उधळून लावली होती. यावेळी दोन्ही गटांत संघर्ष निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना सभागृहाबाहेर पाठविल्यानंतर हा वाद रस्त्यावर पोहोचला होता. पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेमुळे आयोजकांना बैठक रद्द करावी लागली होती. हाच विषय घेऊन आपली भूमिका मांडण्यासाठी बुधवारी शेतकऱयांनी थेट शेतात पत्रकार परिषद घेऊन आयआयटीला विरोध केला.
आयआयटीचा इतका पुळका का ?
आमच्या पूर्वजांनी राखून ठेवलेली जमीन आम्ही आयआयटीसाठी देणार नाही असा निर्णय आम्ही घेतला आहे. प्रसाद गावकर यांनी हा प्रकल्प आणला असता याच लोकांचा विरोध होता. मग आज याच लोकांना आयआयटीचा इतका पुळका का, असा प्रश्न यावेळी शेतकऱयांनी उपस्थित केला. गेल्या रविवारी सांगे येथील श्रीसन प्लाझा सभागृहात बोलावलेल्या बैठकीत आयआयटी विरोधक आणि समर्थक यांच्यात जो संघर्ष झाला, त्याबद्दल यावेळी चीड व्यक्त करण्यात आली.
आयआयटी सांगेत अन्यत्र न्या
आमची बैठक कायदेशीर होती. मात्र स्थानिक आमदार तथा मंत्री फळदेसाई यांच्या समर्थकांनी गोंधळ घालून ती बंद पाडली, असा आरोप यावेळी संतप्त महिलांनी केला. आमचा आयआयटी सांगेत होण्यास विरोध नाही. पण शेती, डोंगर आणि निसर्ग नष्ट करून नियोजित जमिनीत आयआयटी नकोच, असा सूर त्यांनी लावला. आमदारांनी आयआयटी भाटी, नेत्रावळी, रिवण किंवा वाडे-कुर्डीत न्यावी. यापूर्वी येथून गेलेली आयआयटी पुन्हा त्याच ठिकाणी आणण्याचा अट्टहास सोडून द्यावा, असे त्यांनी सांगितले.
दादागिरी चालणार नाही
बारा वर्षांची असताना आपण शेतजमिनीत काम करू लागले होते. आम्ही मरायला तयार आहोत, पण शेतीची जमीन देणार नाही. दादागिरी चालणार नाही. ही जमीन सरकारच्या मालकीची आहे असे सांगितले जाते. पण ती भंडारी नामक माणसाला दिलेली आहे. दुसरीकडे, जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. असे असताना येथेच आयआयटी हवी हा फळदेसाई यांचा अट्टहास का, असा सवाल मारिया क्रूझ यांनी केला.
कुणाचीच फूस नाही
आम्ही आमची शेती आणि जमिनी सांभाळण्यासाठी लढत आहोत. आम्हाला कुणाचीही फूस नाही. आम्हा शेतकऱयांच्या न्याय्य हक्काचा हा प्रश्न आहे. ना माजी मंत्री बाबू कवळेकर, ना सावित्री कवळेकर यांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे. मंत्री फळदेसाई यांनी या आंदोलनाला राजकीय वळण देऊ नये, असे क्रूझ यांनी स्पष्ट केले. ‘आमचो डोंगर आमका जाय’ अशा घोषणा यावेळी महिलांनी दिल्या.
बैठकीवेळी दिशाभूल केली
रविवारच्या बैठकीत राजेश गावकर यांनी माईक हिसकावून घेऊन भाषण केले. या बैठकीत उपस्थित राहणारा माणूस कोण व कुठून आलेला आहे याची माहिती प्राप्त व्हावी म्हणून एका रजिस्टरवर सही घेतली जात होती. पण माया जांगळी यांनी खोटे सांगून रजिस्टरवर आयआयटीला विरोध करत असल्याचा मजकूर लिहिला आणि विरोधात सहय़ा घेतला जात असल्याचा खोटा प्रचार करून समर्थकांची दिशाभूल केली. बैठक सुरू होण्यापूर्वी सभागृहाच्या व्हरांडय़ात समर्थकांचा एक गट उपस्थित होता. हे सर्व फळदेसाई व भाजपचे समर्थक होते. समर्थकांनी आमचे नाव खराब करू नये, समोरासमोर चर्चेला यावे, असे आव्हान लेंफा मास्कारेन्हस यांनी दिले.
गुंडगिरी नको, सामंजस्य हवे
राजेश गावकर यांनी हा प्रकल्प मळकर्णे येथे किंवा माया जांगळी यांनी हा प्रकल्प उगे सोसियोदाद जमिनीत न्यावा, अशी मिल्टन यांनी मागणी केली. ते पुढे म्हणाले की, फक्त भाजपच्या लोकांनी रविवारच्या बैठकीत धुडगूस घातला. अन्य पक्षांचे लोक नव्हते. आयआयटीच्या प्रश्नावर गुंडगिरी नको, सामंजस्य हवे, असे मत त्यांनी व्यक्त केले. उत्तम प्रकारे बोलून तोडगा काढता येतो. असे असताना गोंधळ का, असा सवाल उपस्थित महिलांनी केला.
शेतकऱयांच्या पोटावर पाय ठेवून आयआयटी नको
डोंगर कापले जाणार, पावसाळ्यात पूर येणार, येथील भौगोलिक चित्र बिघडून जाणार. आयआयटी झाली की, स्थानिकांना आंत प्रवेश करण्यास परवानगी मिळणार नाही. हा परिसर सांभाळून ठेवण्याची गरज आहे. येथे शेती केली जात नाही असे खोटे सांगितले जाते. याच जमिनीत लोकांनी भेंडी, तांबडी भाजी, वाल, टोमॅटो आदी पिके घेऊन कोविडच्या काळात पोट भरलेले आहे. सुपीक जमीन नष्ट करून तसेच शेतकऱयांच्या पोटावर पाय ठेऊन आयआयटी नको असा सूर अनेक महिलांनी व्यक्त केला. शेतकऱयांवरच अन्याय आणि अत्याचार का, आयआयटी कोणाच्या भल्यासाठी आणली जात आहे, असा सवाल आंदोलकांनी करून, गरिबांवर अन्याय करू नका, असा इशारा दिला.
प्रसंगी न्यायालय, हरित लवादाकडे दाद मागू
गरज भासल्यास न्यायालयात तसेच हरित लवादाकडे दाद मागणार, असेही प्रकल्प विरोधकांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. ज्या पद्धतीने शेळ-मेळावली येथे विरोध झाला त्याच मार्गाने हे प्रकरण जात आहे की काय असे वाटण्याजोगे चित्र येथे दिसले. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी खास बैठक घेतली असता त्याला उपस्थित 90 टक्के लोकांनी प्रकल्पाला पाठिंबा दिला होता. त्यापूर्वी फळदेसाई यांनी शेतकऱयांची बैठक घेऊन सहमती घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रकल्प विरोधकांनी त्याच जमिनीत आयआयटी उभारण्यास विरोध दर्शविताना आक्रमक भूमिका घेतल्याने संघर्ष अधिक वाढेल, असे दिसत आहे.