पंचनाम्यांसाठी २४ ज्यादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती
प्रतिनिधी / जयसिंगपूर
जुलै २०२१ मध्ये आलेल्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील ४३ गावे बाधित झाली होती, बाधित गावांमधील शेती पिक, घरांची पडझड, तसेच सानुग्रह अनुदानाबाबत शासकीय यंत्रणेमार्फत गावोगावी पंचनामे सुरू आहेत. यासाठी सध्या कृषी विभाग व महसूल विभागाकडून १८ अधिकारी व कर्मचारी पूरबाधित गावांमध्ये जाऊन पंचनाम्याचे काम पूर्ण करीत आहेत, पण नुकसानीचे स्वरूप पाहता पंचनाम्यांसाठी ज्यादा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी होत होती.
हाता तोंडाला आलेले शेतातील पीक पुरात वाहून गेल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला पंचनामे तातडीने पूर्ण करून झाले, तरच शेतीमध्ये तातडीने मशागत करून पुढचे पीक घेता येणार आहे. यासाठी पंचनामे जलद गतीने पूर्ण करा, अशा सूचना मी पूर ओसरताच प्रशासनाला दिल्या होत्या, या पार्श्वभूमीवर मी स्वतः जिल्हा कृषीअधिकारी ज्ञानदेव वाकुरे व तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले यांच्याशी बोलून पंचनामा करणाऱ्या अधिकाऱ्यांची व कर्मचार्यांची संख्या वाढवावी व नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे आदेश दिले होते. याचाच भाग म्हणून आपण दिलेल्या सूचनेनंतर तालुका कृषीअधिकारी यांच्या मागणीप्रमाणे जिल्हा कृषी अधिकारी यांनी शनिवार पासून पंचनामे गतीने होण्यासाठी आणखी २४ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असल्याने शनिवार पासून शिरोळ तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे गतीने होणार आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली आहे.
४३ पैकी १८ गावातील नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाकडून पूर्ण झाले असून उर्वरित २५ गावांमधील पंचनाम्याचे काम आठवडाभरात पूर्ण करा, अशा सूचना आपण संबंधित विभागाला दिल्या असल्याचेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी म्हटले आहे. चालू हंगामात शिरोळ तालुक्यातील जवळपास ३० हजार हेक्टर क्षेत्र खरीपाच्या लागवडीखाली होते. आलेल्या महापुरामुळे लागवडीखालील एकूण क्षेत्रापैकी कृषी विभागाच्या अहवालानुसार नजर अंदाजे २० हजार ५०० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.