कितीही नळीत घातले, तरीही शेपूट वाकडे ते वाकडेच! या म्हणीचा प्रत्यय पाकिस्तानसंदर्भात नेहमीच येत आहे. भारताचा आणि हिंदू धर्माचा द्वेष हाच पाकिस्तानच्या अस्तित्वाचा पाया आहे, हे दर्शविणारी घटना नुकतीच घडली आहे. 1971 आणि त्यापूर्वी तत्कालिन पश्चिम पाकिस्तानच्या सत्ताधीशांच्या सांगण्यावरून पूर्व पाकिस्तान म्हणजेच सध्याचा बांगलादेश येथे अनन्वित अत्याचार बंगाली भाषिक मुस्लीम आणि हिंदूंवर करण्यात आले होते.
या अत्याचारांचा पुराव्यानिशी पर्दाफाश अमेरिकेच्या हिंदू अमेरिकन संस्थेने नुकताच केला. बांगलादेशच्या निर्मितीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तो करण्यात आला होता. यामुळे पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी या हिंदू संघटनेच्या नेत्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे उघड झाले आहे. या संघटनेने बांगलादेशच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त ‘बंगाली हिंदू जेनोसाईड’ (बंगाली हिंदूंचा नरसंहार) या नावाचे एक वेबपेज सुरू केले आहे. दहा महिने चाललेल्या या नरसंहारात 20 ते 30 लाख हिंदूंच्या हत्या करण्यात आल्या. 2 ते 4 लाख हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आणि साधारणतः 1 कोटी लोकांना स्थलांतरित व्हावे लागले, अशी माहिती या वेबपेजवर तत्कालिन संदर्भांसह देण्यात आली आहे. आपले पितळ उघडे पडल्याने पाकिस्तान सरकारच्या छुप्या पाठिंब्याने आता येथील दहशतवादी संघटना या वेबपेज निर्मात्यांना लक्ष्य करीत आहेत, असा आरोप होत आहे. यावरून पाकिस्तानची मनोवृत्ती कळून येते, असे संघटनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.