कामगार, कंत्राटदार व वाहतूकदारांच्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण
प्रतिनिधी / कुडचडे
तीन वर्षे अगोदर आर्लें येथील पेप्सी कंपनीचे उत्पादन शेळपे-सांगे येथील वरुण ब्रिव्हरेजिस कंपनीकडे स्थलांतरित करण्यात आले तेव्हा कंपनीजवळ असलेल्या कामगारांना घेऊन उत्पादन सुरू करण्यात आले. त्यानंतर स्थानिक कामगारांना घेऊन सुरळीतपणे उत्पादन सुरू झाले होते. पण अचानक कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानंतर कंपनीने सर्व कामगारांना पगार देऊन उत्पादन बंद केले. काही आठवडय़ांनी लॉकडाऊन शिथील केल्यावर कंपनीने संबंधित सरकारी अधिकाऱयांकडून परवानगी घेऊन पेट बॉटल्समधील शीतपेयांचे उत्पादन सुरू केले. त्यात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी कंपनीने कमी प्रमाणात कामगार घेऊन व आळीपाळीने यायला लावून काम सुरू केले. यात कोणतेच बिगरगोमंतकीय कामगार नसून सर्व कामगार स्थानिक आहेत. त्यात काही महिला कामगारही आहेत, असे स्पष्टीकरण ‘वरुण ब्रिव्हरेजिस’चे कामगार विनय गावकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
आपला कोणाकडे शत्रुत्व घेण्याचा उद्देश नसून सुरळीतपणे कंपनी सुरू ठेवणे हेच ध्येय आहे. सर्व कामगारांनी एकत्र राहून काम केल्यास कंपनी स्थानिकांच्या साहाय्याने उत्पादन वाढवू शकते. त्यासाठी कामगार एकत्र राहणे गरजेचे आहे. ज्या कामगारांनी त्यांच्या कोणत्याही अडचणीमुळे जो चुकीचा मार्ग पत्करला आहे तो वेळीच थांबवावा. अन्यथा याचे परिणाम सर्व कामगारांना भोगावे लागण्याची शक्यता असून जे स्थानिक कामगार या कंपनीत सध्या कामाला आहेत त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट येऊ शकते, असे गावकर यांनी सांगितले.
काही दिवसांच्या अगोदर शेळपे येथील वरुण ब्रिव्हरेजिस कंपनीत बिगरगोमंतकीय कामगारांना घेऊन काम सुरू करण्यात आल्याचा दावा काही कामगारांनी प्रसारमाध्यमांसमोर केला होता. त्यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी शेळपे येथे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उगे पंचायतीचे सरपंच अर्जुन नाईक, कामगारवर्ग तसेच कंत्राटदार उपस्थित होते.
स्थानिक आमदारांनी लक्ष घालावे : नाईक
आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे कंपनीच्या उत्पादनात घट झालेली आहे. त्यात कामगारांचा जो विषय उपस्थित झाला आहे त्यामुळे जास्त अडचण निर्माण झाली आहे. उत्पादन जास्त होत नसल्यामुळे तीन दिवसांत एक गाडी भरली जाते. त्यामुळे वाहतूकदार या नात्याने स्थानिक आमदारांना आपली विनंती आहे की, त्यांनी कंपनीच्या कामगारांचा जो विषय आहे त्यात लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी नीतेश नाईक यांनी केली.
ज्यांनी चुकीची माहिती पसरविलेली आहे त्या कामगारांमधील थोडय़ा जणांना लॉकडाऊन सुरू असल्यामुळे कामावर रूजू होण्यास सांगितले होते. पण सदर कामगारांची मागणी त्यांच्यासोबत असलेल्या सर्व कामगारांना एकदमच रूजू करून घ्यावे अशी असून लॉकडाऊनच्या अटी असल्यामुळे ती मागणी कंत्राटदार मान्य करू शकत नाहीत. तरी कंपनीचे उत्पादन पुढे जसजसे वाढत जाणार त्याप्रमाणे हळूहळू सर्व कामगारांना घेण्यात येईल असे त्यांना सांगण्यात आलेले आहे. सदर कामगारांनी गैरसमज करून घेऊ नये आणि बोलाविलेल्या कामगारांनी कामावर रूजू व्हावे. तरच या विषयावर तोडगा निघू शकतो, असे सदर कंपनीच्या जुन्या कंत्राटदाराने सांगितले.
कंपनीशी चर्चा करून तोडगा काढावा : नाईक
संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करावा लागल्याने आर्थिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे. तरी सुद्धा कंपनी धाडस करून स्थानिकांना आर्थिक साहाय्य मिळावे या हेतूने उत्पादन सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात कामगारांनी अडथळे आणू नयेत. अन्यथा त्याचा त्रास हा त्यांच्याच गावबंधूंना होणार व त्यांच्यावर आर्थिक संकट येणार. ज्या कामगारांना कामासंदर्भात समस्या आहेत त्यांनी कंपनीच्या अधिकाऱयांशी चर्चा करून तोडगा काढावा. कारण प्रकल्प बंद झाल्यास कंपनीला फरक पडणार नसून फक्त कामगारांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतील, असे मत सरपंच अर्जुन नाईक यांनी व्यक्त केले.