गोंयच्या कुळ मुंडकायाचो आवाज व गाकुवेध संघटनेची मागणी
प्रतिनिधी/ फोंडा
शेळ-मेळावली येथे बहुजन समाजावर होणाऱया अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी बहुजन समाजाचे नेते पाठिंबा का दर्शवित नाही. आंदोलनाचा अनुभव असलेल्या उटा संघटनेने अजूनपर्यंत क्रियाशील पाठिंबा का दिलेला नाही? आदिवासी समाजाचे नेतृत्व करणारे मंत्री गोविंद गावडे यांनी शेळ-मेळावलीप्रकरणी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी वारखंडे फोंडा येथे सरकारच्या निषेधार्थ घेतलेल्या बैठकीत विविध संघटनांनी केली आहे.
गोंयच्या कुळ मुंडकाराचो आवाज आणि गाकुवेध फेडरेशनतर्फे शेळ मेळावलीच्या ग्रामस्थाना पाठिंबा व सरकारच्या निषेधार्थ काल रविवारी झरेश्वर सभागृहात बैठक झाली. यावेळी गाकुवेधचे रूपेश वेळीप, शेतकरी रमेश सतरकर, उदय गावकर, काणकोणचे राजू भगत, हरी गावडे उपस्थित होते.
सरकारने दडपणशाही कारभार चालवून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शविणाऱयाविरोधात पोलिस कारवायांचे सत्र आरंभलेले आहे. पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर याची कृती ही अमानवी असून त्याला त्वरीत सेवेतून बडतर्फे करावे. शेळ मेळावलीच्या ग्रामस्थांना एकटे पाडण्याचा सरकारचा डाव कदापी यशस्वी होऊ देणार नाही. गोंयच्या कुळ मुंडकाराचो आवाज व गोकुवेध संघटनेचा शेळ मेळावली ग्रामस्थाना ठाम पाठिंबा असून लोकशाही मार्गाने प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा गाकुवेधचे उदय वेळीप यांनी दिला.
शेळ-मेळावलीप्रश्नी सर्व संघटनांनी एकत्रित यावे-जल्मी
गोवा मुक्तीच्या साठ वर्षानंतरही येथील शेतकऱयांना जमीन हक्क देण्यासाठी सरकारने कोणतेच प्रयत्न केलेले नाही, याउलट एक चौदा उताऱयावर शेतकरी म्हणून असलेली नावेही संगणकीय दस्ताऐवज तयार करताना मुद्दामहून गायब करण्यात आलेली आहेत. शेळ मेळावली येथील शेतकरी कष्टकरी समाजावर होणारा अन्याय बहुजन समाजातील लोकप्रतिनिधींना दिसत नाही का? असा सवाल यावेळी उपस्थित केला आहे. एसटी कमिशनर म्हणून रमेश तवडकर यानी आपले दायित्व प्रामाणिकपणे पार पाडलेले आहे का? उदय गावकर, नामदेव फातर्पेकर, प्रकाश वेळीप यांनी मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप रामकृष्ण जल्मी यांनी केला आहे.
शेळ मेळावली येथील भूमिपुत्रांवर अन्याय करून सरकार आयआयटी का आणू पाहतोय, कोणाच्या भल्यासाठी? स्व. मनोहर पर्रिकर यांनी आयआयटीसाठी सांगे तालुक्य़ाची निवड करण्यात आली होती. शेळ मेळावली येथील साडे तेरा लाख चौ. मिटर जमिन आयआयटीसाठी देण्यासाठी रेखाटन मोहिम सुरू केली आहे. आपल्या जमिनी पुढील पिढीसाठी सांभाळून ठेवण्यासाठी सरसावलेल्या महिला मागील सहा महिने उपासमारी व पोलिसांच्या अत्याचार सहन करीत आहेत. बहुजन समाजा पुळका असलेल्या प्रत्येक संघटनेने त्यांना पाठिंबा दर्शवावा असे आवाहन उदय गावकर यांने केले. मडकई बचाव समितीचे प्रेमानंद गावडे यांनीही पाठिंबा दर्शविलेला असून येत्या काळात अनेक संस्था आंदोलनाला पाठिंबा दर्शविणार असल्याचे संकेत यावेळी व्यक्त करण्यात आले.