वृत्तसंस्था/ कोलंबो
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात यजमान लंकेने भारताचा 3 गडय़ांनी पराभव केला. या विजयामुळे लंकेने या मालिकेत व्हाईटवॉश टाळला. भारताने ही मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तब्बल नऊ वर्षांनंतर लंकन संघाने मायभूमीत पहिला वनडे सामना जिंकला. लंकेच्या अविष्का फर्नांडोला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद 225 धावा जमविल्या होत्या. पण पावसाच्या व्यत्ययामुळे लंकेला 227 धावांचे उद्दिष्ट देण्यात आले. अविष्का फर्नांडो आणि राजपक्षे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर लंकेने 39 षटकात 7 बाद 227 धावा जमवित विजय नेंदविला. अविष्का फर्नांडोने 98 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 76 तर भानुका राजपक्षेने 56 चेंडूत 12 चौकारांसह 65 धावा जमविल्या. या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 109 धावांची भागीदारी केली. असालंकाने 28 चेंडूत 3 चौकारांसह 24 तर रमेश मेंडीसने 1 चौकारासह नाबाद 15 धावा जमविल्या. भारतातर्फे राहुल चहरने 54 धावांत 3 तर साकारियाने 34 धावांत 2 तसेच के. गौतम आणि हार्दिक पंडय़ा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण दर्जेदार झाले नाही. भारताकडून लंकेला तीन जीवदाने मिळाली. पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी हा सामना 47 षटकांचा खेळविण्याचा निर्णय घेतला होता. भारताचा डाव सुरू असताना पावसाचा अडथळा आल्याने काही वेळ खेळ थांबवावा लागला. ओलसर खेळपट्टीचा लंकेच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक फायदा उठविल्याने भारतीय फलंदाजांना 225 धावांपर्यंत मजल मारता आली. वनडे मालिका संपल्यानंतर आता भारत आणि लंका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला रविवारी येथे प्रारंभ होणार आहे.
संक्षिप्त धावफलक ः भारत- 43.1 षटकात सर्वबाद 225 (पृथ्वी शॉ 49, मनीष पांडे 11, हार्दिक पांडय़ा 17, सूर्यकुमार यादव 40, जयविक्रमा 3-59, धनंजय 3-44), लंका- 39 षटकात 7 बाद 227 (आविष्का फर्नांडो 76, भानुका राजपक्षे 65, असलेंका 24, रमेश मेंडीस नाबाद 15, राहुल चहर 3-54, साकारिया 2-34, गौतम 1-49, हार्दिक पांडय़ा 1-43).