मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांची आमदार वैभव नाईक यांना ग्वाही
प्रतिनिधी / मालवण:
मच्छीमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात नुकसान झालेल्या मच्छीमारांना राज्य सरकारने 65 कोटी 17 लाखांचे पॅकेज जाहीर करून आपली मागणी मान्य केली. याबद्दल आमदार वैभव नाईक यांनी मत्स्योद्योग मंत्री अस्लम शेख यांची गुरुव<ारी मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन त्यांचे आभार मानले. तसेच सिंधुदुर्गमध्ये या पॅकेजची अंमलबजावणी करण्याची मागणी केली. त्यावर शेख यांनी सिंधुदुर्गातील शेवटच्या मच्छीमारापर्यंत पॅकेजचा लाभ देणार असल्याची ग्वाही देत तशी कार्यवाही करण्याचे निर्देश मत्स्यविकास अधिकाऱयांना दिले आहेत.
ऐन मच्छीमारी हंगामात आलेल्या क्यार व महा चक्रीवादळाच्या तडाख्यात सिंधुदुर्गमधील मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते. राज्य सरकारने याची दखल घेऊन मच्छीमारांसाठी 65 कोटी 17 लाखांचे पॅकेज जाहीर केले आहे. आमदार नाईक यांनी ही मागणी लावून धरत पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मत्स्योद्योग मंत्री शेख यांनी ही मागणी मान्य केली. त्याबद्दल आमदार नाईक यांनी शेख यांची भेट घेऊन आभार मानले.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेची सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हय़ात योग्य अंमलबजावणी करण्यासाठी मी व खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्या उपस्थितीत संबंधित वरिष्ठ अधिकाऱयांची आढावा बैठक आयोजित करण्याची मागणी नाईक यांनी शेख यांच्याकडे केली. त्याबाबतही शेख यांनी नियोजनासाठी बैठक आयोजित करून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा फायदा महाराष्ट्रातही जास्तीत जास्त करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली.