शार्दुल ठाकुरची संघातून मुक्तता, उमेश यादवला तंदुरुस्ती चाचणी पार केल्यास संधी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी निवड समितीने भारतीय संघातील 18 पैकी 17 खेळाडू जैसे थे ठेवले असून उमेश यादवचा तंदुरुस्ती चाचणी पार करण्याच्या अटीवर संघात समावेश केला गेला आहे. भारत-इंग्लंड यांच्यातील 4 कसोटी सामन्यांची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत असून तिसरी कसोटी अहमदाबादमध्ये दि. 24 फेब्रुवारीपासून दिवस-रात्र खेळवली जाणार आहे.
भारतीय संघातून शार्दुल ठाकुरची मुक्तता केली गेली असून त्याला विजय हजारे चषक स्पर्धेत खेळण्याचे निर्देश दिले गेले आहेत. अनुभवी जलद गोलंदाज मोहम्मद शमीच्या तंदुरुस्तीविषयी अद्याप साशंकता आहे. 5 दिवसांच्या क्रिकेट प्रकारासाठी तो अद्याप 100 टक्के तंदुरुस्त नसल्याचे संकेत आहेत. बीसीसीआय सचिव जय शाह यांनी ईमेलद्वारे सदर बदलाची माहिती दिली.
पहिल्या कसोटीत खराब प्रदर्शन करणाऱया शाहबाज नदीमला अपेक्षेप्रमाणे राखीव खेळाडूंमधून वगळले गेले असून लेगस्पिनर राहुल चहर व यष्टीरक्षक-फलंदाज कोना स्रीकर राखीव खेळाडूत समाविष्ट आहेत. प्रियंक पांचाळ व अभिमन्यू ईश्वरन यांनाही विजय हजारे चषक स्पर्धेत खेळण्यासाठी मुक्त केले गेले आहे. चेन्नईतच असणारे पाच नेट गोलंदाज आता अहमदाबादमध्ये संघात दाखल होणार असून यात अंकित रजपूत, अवेश खान, संदीप वॉरियर, कृष्णप्पा गौतम, सौरभ कुमार यांचा समावेश आहे.
भारतीय संघ ः विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयांक अगरवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएल राहुल, हार्दिक पंडय़ा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, जसप्रित बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू- केएस भरत, राहुल चहर.