ऑनलाईन टीम/नवी दिल्ली
इंधनाच्या दरात होत असलेली वाढ आता काहीशी थांबतेना थांबते पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ सुरु झाली आहे. पेट्रोलच्या दराने शंभरी पार केलीच असताना आता डिझेलचे दरही शंभरीच्या उबंरठ्यावर येवून ठेपले आहेत. यातच गॅसचेही दर वाढले असल्याने या वाढत्या महागाईने जनता मेटाकुटीला आली आहे.
महागाईचा हाच धागा पकडत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीवरून पुन्हा मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारची तुलना पुरातन लोककथांमधील भरमसाठ करवसुली करणाऱ्या सत्ताधाऱ्यांशी केलीय. तर, मोदी सरकारने गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या करातून जमा केलेले २३ लाख रुपये कुठं गेले? असा प्रश्नही उपस्थित केलाय.
राहुल गांधींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “पुरातन लोककथांमध्ये भरमसाठ करवसुली करणाऱ्या स्वार्थी सत्ताधाऱ्यांच्या गोष्टी होत्या. अशावेळी सुरुवातीला जनता दुखी होते, मात्र नंतर शेवटी हीच जनता हे सरकार संपवते. वास्तवातही असंच होणार असे ट्विट करत त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी करखंडणी (Tax Extortion) आणि इंधन दर (Fuel Prices) हे हॅशटॅग देखील वापरले आहेत.
राहुल गांधींनी या ट्विटसोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीचा वाढता आलेख दाखवला आहे. त्यात त्यांनी म्हटलं, “सरकारने २३ लाख कोटी रुपये जीडीपीतून कमावले आहेत. हा जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट नाही, तर गॅस, डिझेल, पेट्रोल आहे. हे २३ लाख कोटी रुपये गेले कुठं हा माझा प्रश्न आहे. नागरिकांच्या खिशातून जो पैसा हिसकावून घेतला जात आहे हा पैसा कुठं जातोय हा जनतेनं प्रश्न विचारायला हवा असे म्हणत असा विकास देशासाठी हानिकारक असल्याचे म्हटले आहे.