विठ्ठलराव हलगेकर यांचे प्रतिपादन : शिवगर्जना नाटकाचे दिमाखदार उद्घाटन
प्रतिनिधी/ खानापूर
सामान्यांच्या प्रश्नासाठी ज्या पद्धतीने मी कार्यरत आहे, त्या कार्याची पोचपावती तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मी सहकार व शैक्षणिक क्षेत्रात हे भव्यदिव्य कार्य करू शकलो. पुढील काळात खानापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी शेवटच्या माणसापर्यंत सेवा करण्याचे भाग्य मला मिळावे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी सामाजिक बांधिलकी जपत कार्यरत राहीन, ही ग्वाही देतो, असे उद्गार महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांनी सिंहगर्जना या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केले.
महालक्ष्मी ग्रुप व खानापूर तालुका भाजपच्यावतीने विठ्ठलराव हलगेकर यांचा साठावा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने तालुक्यातील जनतेसाठी शिवगर्जना या महानाट्याचे येथील शांतीनिकेतन शाळेच्या आवारात आयोजन करण्यात आले होते. या नाटकाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बेंगळूर येथील मंजुनाथ स्वामी, आवरोळी मठाचे चिन्नबसवरू स्वामी, शिरपूर मठाचे आडसिद्धेश्वर स्वामी, चिक्कमन्नोळी मठाचे शिवपुत्र स्वामी, मुक्ती मठाचे शिवार्चण स्वामी, भाजपचे ज्येष्ठ नेते शंकरगौडा पाटील, भाजपचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार संजय पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप तालुका अध्यक्ष संजय कुबल, भाजपच्या नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, किरण येळ्ळूरकर, राज्य वन निगमचे संचालक सुरेश देसाई, भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते किरण येळ्ळूरकर यांसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. शिवगर्जना या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. प्रथम उपस्थितांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल हलगेकरांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील बोलताना म्हणाले, शिवाजी महाराजांची प्रेरणा या नाटकातून घेऊन प्रत्येकाने शिवाजी महाराजांचा आदर्श जपावा. तसेच शिवाजी महाराजांनी देव-देश-धर्मासाठी जे कार्य केले त्याची सतत आठवण ठेवून भविष्यकाळात तालुक्याचे भविष्य बदलण्यासाठी योग्य निर्णय घ्यावा आणि तालुक्याच्या विकासाच्यादृष्टीने जनतेने योग्य नेतृत्वाला वाव द्यावा. बेंगळूर येथील क्षत्रिय मठाचे मंजुनाथ स्वामी म्हणाले, शिवाजी महाराज हे संपूर्ण विश्वाचे आदर्श आहेत. त्यांच्या आदर्शाचा आजही अभ्यास केला जातो. शिवाजी महाराजांनी जात-धर्मापलीकडे जाऊन मानवतेचा विचार करत धर्माचे रक्षण केले. मात्र इतर धर्मांचा त्यांनी कधीच द्वेष केला नाही. आज तरुणांनी त्यांच्या चारित्र्याचा अभ्यास करून आदर्श जोपासला पाहिजे.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, संजय कुबल, शंकरगौडा पाटील यांची भाषणे झाली. यानंतर शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून शिवगर्जना नाटकाचे उद्घाटन करण्यात आले. पहिल्याच दिवशी तालुक्यातील शिवप्रेमी जनतेने प्रचंड गर्दी केली होती. नाटक पाहण्यासाठी संध्याकाळी चार वाजल्यापासून शांतीनिकेतन मैदानावर लोकांची गर्दी जमण्यास सुरुवात झाली होती. शांतीनिकेतन शाळेच्या आवारात महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने नियोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्वांना भोजन व्यवस्था करण्यात आली होती.
पहिल्याच प्रयोगाला वीस हजारावर शिवप्रेमी जनतेने उपस्थिती दर्शवली होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. थंडी असूनही दुर्गम भागातून लोक नाटक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिला दिवस असल्याने उद्घाटन कार्यक्रम संपण्यास व नाटक सुरू होण्यास दहा वाजले. या महानाट्याचे पुढील चार दिवस प्रयोग चालणार आहेत. रोज सायंकाळी सात वाजता याठिकाणी प्रयोगाला सुरुवात होणारआहे.