जिल्हाधिकाऱयांना माध्यमिक शिक्षक संघटनेचे निवेदन :
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारीमुळे शिक्षणावर मोठा परिणाम झाला आहे. शाळा कधी सुरू होणार याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. असे असले तरी शिक्षक आणि विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून तसेच मोबाईलच्या माध्यमातून संपर्कात आहेत. सरकारने याबाबत सहकार्य केले आहे. याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानत आहे. मात्र कोरोना असूनही शिक्षकांना घेण्यात येणाऱया कार्यशाळा यामुळे शिक्षकांनाच कोरोना होत आहे. तेंव्हा याबाबत गांभीर्याने विचार करून असे कार्यक्रम रद्द करावेत, अशी मागणी कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षक संघटनेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे, काही संस्थांनी शिक्षकांना कमी केले आहे तर काही शिक्षण संस्था अर्धापगार देत आहेत. त्यामुळे शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तेंव्हा त्या शिक्षकांना तात्काळ आर्थिक मदत जाहीर करणे गरजेचे आहे. काही शिक्षकांची तर अत्यंत बिकट परिस्थिती झाली आहे. कमी केल्यामुळे आता पुढे काय करायचे? असा प्रश्न या शिक्षकांना पडला आहे. तेंव्हा याचा गांभीर्याने विचार शिक्षण संस्थांनी करावा, अशी मागणी करण्यात आली.
गेली अनेक वर्षे विनावेतन काम केले. शिक्षण संस्था देतील त्या वेतनामध्ये काम करून विद्यार्थ्यांना घडविले. अनुदानित शिक्षण संस्थांप्रमाणेच शाळेचा निकाल लागला. त्यापेक्षाही अधिक काही खासगी संस्थांनी निकाल लावून एक वेगळी छाप पाडली आहे. मात्र शिक्षकांकडे माणुसकीच्या दृष्टिकोनातून सरकार आणि शिक्षण संस्था बघत नाहीत हे दुर्दैव म्हणावे लागेल. शिक्षकांना आता दुसरा व्यवसाय करणे अवघड आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना कुटुंब सांभाळायचे कठीण झाले आहे. तेंव्हा सरकारने याची सखोल चौकशी करून अशा शिक्षकांना विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव उमेश कुलकर्णी, सहसचिव वामन कुलकर्णी, खजिनदार सुरेश कळ्ळेकर, माजी जिल्हाध्यक्ष राजू कुडतुरकर, एन. ओ. डोणकरी, शहराध्यक्ष संजीव कोष्टी, शहर सचिव अंगडी, राज्य सचिव आर. पी. वंटगोडी, उपाध्यक्ष विश्वजित हसबे, व्ही. एन. पाटील, मंजुनाथ गोल्लीहळ्ळी यांच्यासह जिल्हय़ातील शिक्षक व पदाधिकारी उपस्थित होते.