ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील शाळांचे शैक्षणिक वर्ष जानेवारी ते डिसेंबर असे सुरू करण्याचा ठाकरे सरकारचा मानस आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारशी विचारविनिमय करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत.
राज्याच्या शैक्षणिक धोरणासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे राज्यात मागील 3 महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू आहे. मात्र, सध्याचा कोरोनाचा काळ पाहता राज्याला शैक्षणिक धोरण बदलावे लागेल, त्यासाठी कायद्यात बदल करावे लागतील. काही योग्य आणि अनिवार्य बदल स्वीकारावे लागतील.
सध्याच्या स्थितीत शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन जसे शक्य होईल, तसे शिक्षण मिळाले पाहिजे. शिक्षण विभागाने या मार्गातील सर्व उणिवा, अडथळे दूर करावेत. केंद्राच्या नवीन शैक्षणिक धोरणाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले.
ऑनलाईन शिक्षणातून पहिली ते बारावी पर्यंतचा 25 टक्के अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. ऑक्टोबरमध्ये यासंदर्भात आढावा घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बैठकीत सांगितले.