पोलिसांवर खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल करावा चोडणकर यांची मागणी
प्रतिनिधी/ पणजी
शैलेंद्र सुभाष वेलिंगकर यांना पोलिसांकडून झालेली अमानुष मारहाण हा खुनाच्या प्रयत्नांचाच गुन्हा असून अशाप्रकारे पोलिसच कायदा हाती घेऊ लागले तर राज्यात अराजक माजेल, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे. पोलीस जर मेळावलीतील लोकांना खुनाच्या प्रयत्नासंबंधीची कलमे लावून अटक करत असतील तर वेलिंगकरांना मारहाण करणाऱया पोलिसावरही तीच कलमे लावावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मेळावलीत आयआयटी विरोधात आंदोलन करणाऱया स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी गेलेल्या शैलेंद्र वेलिंगकर यांनी कोणताही गुन्हा केलेला नव्हता. तरीही पोलिसांनी त्यांना पकडून एखादा खुनी किंवा दरोडेखोर असल्यागत अमानुष मारहाण केली. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा असून सरकारची फूस असल्याशिवाय पोलीस हे धाडस करू शकणार नाहीत हे स्पष्ट आहे. शैलेंद्र यांचे वडील सुभाष वेलिंगकर हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी गोवा संघचालक असून त्यांच्याशी असलेल्या वैरत्वातून भाजपने स्वतःचा राग त्यांच्या पुत्रावर काढला आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.
राज्यातील विद्यमान सरकार हे अत्यंत असंवेदनशील, गोवा व गोमंतकीयविरोधी आहे. लोकशाहीची सर्व तत्वे या सरकारने पायदळी तुडविली आहेत. या सरकारला मानव हक्क अधिकारांचीही किंमत नाही. त्यामुळेच लोकांचा विरोध असतानाही कित्येक प्रकल्प लादू पाहात असून विरोध करणाऱयांना चिरडून टाकण्यासाठी उद्दाम पोलिसांची मदत घेतली जात आहे. यापूर्वी राज्यात कार्तिक कश्यप हा आरएसएससी निगडीत पोलीस अधिकारी होता, आता त्याचीच दुसरी आवृत्ती मागविण्यात आली असून अल्पावधीतच हा अधिकारी गोव्याचा ’सुपर डिजीपी’ बनला आहे. त्यानेच वेलिंगकर यांना बेदम मारहाण केली असून सध्या शैलेंद्र यांची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे, असे चोडणकर यांनी सांगितले.
शैलेंद्रचा वैद्यकीय अहवाल जाहीर करावा
त्यातल्या त्यात आशेचा किरण म्हणजे या पोलिसी मारहाणीची राज्यातील न्यायव्यवस्थेने दखल घेतली आहे. न्यायाधिशांनी वेलिंगकर यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला व न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्याबद्दल आपण न्यायव्यवस्थेला धन्यवाद देतो, असे चोडणकर म्हणाले. त्याचबरोबर वेलिंगकर यांच्या आरोग्य तपासणीसाठी खास वैद्यकीय तज्ञांची समिती नियुक्त करावी व सदर अहवाल जाहीर करावा, अशी मागणी चोडणकर यांनी केली आहे.
काँग्रेस सत्तेच्या काळात अनेक आंदोलने झाली. परंतु आंदोलकांचा आवाज चिरडण्याचे प्रकार कधीच झाले नव्हते. लोकशाहीत आंदोलन करणे हा नागरिकांचा हक्क. ते चिरडण्याचा अधिकार कोणत्याही सरकारला नाही. परंतु विद्यमान सरकार स्वतःला लोकशाहीपेक्षाची श्रेष्ठ मानत आहे की काय असा संशय येण्यासारखे वर्तन दाखवत आहे, असे चोडणकर म्हणाले.
आप आरएसएसचे अपत्य, भाजपची बी टीम
आम्ही केवळ खडा टाकला होता. तो आम आदमी पक्षाच्या वर्मी लागला. त्यातूनच त्यांचे खरे स्वरूप उघड झाले व आप हे आरएसएसचे अपत्य व भाजपची बी टीम असल्याचे ठामपणे सिद्ध झाले, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी व्यक्त केले. भाजपला शह देण्यासाठी आपने काँग्रेससोबत युती करावी असे एका मुलाखतीत आपण म्हटले होते. त्यामागे काँग्रेसबद्दल आपचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न होता. आपल्या वक्तव्यावर त्या पक्षाचे स्थानिक तसेच केंद्रीय नेत्यांनी एवढय़ा जलद प्रतिक्रिया दिल्या. त्यातून त्यांचे खरे रूप उघड झाले व आपला प्रयत्न सफल झाला. काँग्रेसमुक्त भारत हा भाजपचा कार्यक्रम आहे, त्यात पूर्ण योगदान देण्यासाठी आप गोव्यात कार्यरत आहे, असे चोडणकर म्हणाले.
भाजपने आपला दिल्ली बहाल केली असून त्या बदल्यात अन्य राज्यात काँग्रेसला संपविण्याचे काम सोपविले आहे. म्हणूनच आप कधीही काँग्रेससोबत युती करणार नाही हे सिद्ध होत आहे. गोव्यात यापूर्वी विधानसभा तसेच जिल्हा पंचायत निवडणुकीतही आपमुळेच किरकोळ फरकाने अनेक काँग्रेस उमेदवारांना पराभूत व्हावे लागले आहे याची अनेक उदाहरणे आहेत.
अण्णा हजारे, प्रशांत भूषण, मयंक गांधी, एल्वीस गोम्स, प्रदीप पाडगावकर यासारख्या अनेक नेत्यांनी पुस्तकांमधून किंवा बोलण्यातून, भाषणाद्वारे पक्षाची षडयंत्रे व कुटील डाव लोकांसमोर आणले आहेत. या नेत्यांनी आपसाठी स्वतःच्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ दिल्यानंतर तेथील कटू अनुभव घेत पक्षापासून फारकत घेतली. त्यांच्या या अनुभवातून गोमंतकीयांनी धडा घ्यावा. भाजपला खरोखरच शह द्यायचा असेल तर आपपासून दूर गेलेल्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू, असे चोडणकर म्हणाले.