प्रतिनिधी / सातारा :
दिवाळी सणानिमित्त लाईटच्या माळा लावण्याचे काम करताना वीज वितरणच्या मुख्य वाहिनीला हात लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांना वाचवण्यासाठी गेलेले तिघे गंभीररीत्या भाजून जखमी झाले आहेत. हे एकाच कुटुंबातील असून पती, पत्नी आणि दोन मुले असे आहेत. साताऱ्यातील मोरे कॉलनीत शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली.
दिवाळी अवघ्या चार-पाच दिवसावर आली असून सर्वत्र विद्यृत रोषणाई करण्यात येत आहे. अशीच विद्यृत रोषणाई करण्याचे काम सुनिल तुकाराम पवार (वय 42) हे करत होते. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लाईटच्या माळा लावत असताना घराजवळून गेलेल्या वीज वितरणच्या मुख्य लाईनला त्यांचा हात लागला. त्यामुळे ते तारेला चिकटले. हा प्रकार लक्षात येताच पत्नी मनिषा यांनी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याही त्यांना चिकटल्या. त्यांची दोन्हीही मुले श्रवण आणि ओम हे सुद्धा आई-वडिलांच्या मदतीसाठी धावून आले असता त्यांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये हे चौघेही गंभीररित्या भाजून जखमी झाले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना तात्काळ साताऱ्यातील खाजगी रूग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच सुनिल पवार यांचा मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी मनिषा आणि मुले श्रवण, ओम यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ उपचार सुरू केले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलीसांकडून सांगण्यात येत आहे.