ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यातील मेलहुरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले.
शोपियांमधील मेलहुरा गावात काही दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दलाने सोमवारी सायंकाळपासून शोधमोहीम हाती घेतली. दरम्यान, एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना सरेंडर करण्यास सांगण्यात आले. मात्र, दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. भारतीय जवानांनी या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत सोमवारी रात्री एका दहशतवाद्यांला कंठस्नान घालण्यात आले. तर दुसऱ्या दहशतवाद्याला आज सकाळी कंठस्नान घालण्यात आले.
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडून एके -47 रायफल आणि पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. काल सायंकाळापासून सुरू असलेली चकमक आज थांबल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले आहे.