लडाख सीमेवरील भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांच्याकडून कौतुक
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताच्या पराक्रमी सैनिकांनी लडाख सीमेवर शौर्याची परिसीमा गाठत चीनच्या सेनेला मागे परतण्यास भाग पाडले आहे. चीनच्या सेनेचा प्रत्येक डावपेच हाणून पाडत आपल्या सेनेने प्राणपणाने देशाच्या सीमांचे संरक्षण केले आणि आपल्या भूमीचा एक तुकडाही गमावू दिलेला नाही, अशा शब्दांमध्ये संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी भारती सैनिकांची प्रशंसा केली. ‘फिक्की’ या औद्योगिक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी परिस्थिती कथन केली.
चीनने भारताच्या भागात अतिक्रमण केले आहे, असा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. त्याला राजनाथसिंग यांनी दिलेले हे प्रत्युत्तर आहे असे मानले जात आहे. चीनी सैनिकांना भारतीय सैनिकांनी पिटाळून लावले, हे संरक्षणमंत्र्यांचे विधान, लडाख सीमेवर गेले आठ महिने सुरू असणाऱया तणावाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्वाचे असल्याची प्रतिक्रिया संरक्षण तज्ञांनी व्यक्त केली.
चीनचा हल्ल्याचा प्रयत्न फसला
भारतीय सैनिकांना बेसावध ठेवून हल्ला करण्याचा चीनचा प्रयत्न फसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताकडून कोणतीही प्रक्षोभक कारवाई झालेली नसताना चीनने वर्चस्ववादी भूमिकेतून हा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याला माघार घ्यावी लागली. आपल्या सैनिकांनी पराक्रमाची शर्थ केली. चीनने आंतरराष्ट्रीय करारांचा आणि द्विपक्षीय करारांचा भंग करण्याचा चंगच बांधला आहे. त्यामुळे भारताने आपल्या सीमांच्या सुरक्षेसाठी लडाखमध्ये प्रचंड शस्त्रसामग्री आणि सैनिक नियुक्त केले आहेत. दोन्ही बाजू एकमेकांसमोर उभ्या ठाकल्या ओत. चीनने केवळ हिमालयातच नव्हे तर आपल्या प्रत्येक शेजाऱयाविरोधात आपल्या वर्चस्ववादी भूमिकेचे प्रदर्शन करावयास प्रारंभ केला असून जगासमोरच आव्हान निर्माण केल्याचा आरोपही राजनाथसिंग यांनी केला.
अद्यापही तणाव कायम
गेल्या मे महिन्यापासून लडाख सीमेवर चीनने मोठय़ा प्रमाणात सैन्य व शस्त्रांची जमवाजमव करीत युद्धाची तयारी चालविली आहे. गेल्या 20 जूनच्या मध्यरात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ मारामारी होऊन भारताच्या 20 सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. भारतीय सैनिकांनीही अतुलनीय पराक्रम गाजवत चीनच्या 50 हून अधिक सैनिकांना यमसदनी धाडले होते. तेव्हापासून सीमेवर तणाव असून भारताने कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी केली आहे.
महत्वाची पर्वतशिखरे पादाक्रांत
भारताला बेसावध ठेवून सीमारेषा बदलण्याचा चीनचा प्रयत्न हाणून पाडतानाच भारताने लडाख भागातील अनेक उंच आणि महत्वाची पर्वतशिखरे पादाक्रांत करत चीनला आश्चर्याचा धक्का दिला. ही शिखरे भारताच्या आधीन असल्याने चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यास भारत सक्षम झाला असून प्रत्यक्ष संघर्ष सुरू झाल्यास भारताला या शिखरांचा लाभ मिळणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.
थंडीने चीनी सैनिक संत्रस्त
सीमेवर भारताने चीनच्या तोडीस तोड सैनिकांची नियुक्ती केली असून भारतीय सैनिक कडाक्याच्या थंडीतही संघर्ष करण्यास सक्षम आहेत. मात्र चीनच्या सैनिकांना थंडी सहन करण्याची सवय नसलयाने चीनची अडचण होत आहे, असे निरीक्षण अनेक संरक्षण तज्ञ व अभ्यासकांनी नोंदविले आहे.
संरक्षणमंत्र्यांच्या विधानाचे महत्व
फिक्कीच्या कार्यक्रमात बोलताना राजनाथसिंग यांनी सविस्तर माहिती दिली नसली तरी अत्यंत सूचक असे विधान केले. ‘चीनला पिटाळून लावले’ या विधानातून त्यांनी सीमेवरील स्थितीच स्पष्ट केल्याचे मत व्यक्त होत आहे. भारताच्या कोणत्याही भागात अतिक्रमण करण्याचा चीनचा प्रयत्न असफल झाला असल्याचेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सांगितले असे मानले जात आहे.