जिल्हा प्रशासनाकडे नोंद असणारेच प्रवास पात्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्याची घोषणा होऊन ती प्रत्यक्षात अंमलात देखील आली आहे. तथापि या ट्रेनमधून सरसकट सर्वांना सोडण्यात येत नाही. ज्यांची नोंद संबंधित जिल्हा प्रशासनाकडे आहे आणि ज्यांची प्रकृती ठीक आहे, व ज्यांना राज्य सरकारने प्रवासाची परवानगी दिली आहे, अशानांच या श्रमिक स्पेशल ट्रेनमधून प्रवास करता येणार आहे. या प्रवाशांना जिल्हा प्रशासनाचे आरोग्य प्रमाणपत्र आणि हातावर प्रवासासाठीचा शिक्का तसेच मास्क या बाबी अनिवार्य असतील. त्यांच्याकडून प्रवासासाठीची आवश्यक कागदपत्रे दिली जातील, असे रेल्वेच्या प्रसिद्धी विभागाने जाहीर केले आहे.
शुक्रवारी संध्याकाळपासून श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु करण्याची घोषणा झाल्यानंतर अनेकांनी रेल्वेस्थानकाकडे चौकशीचा सपाटा लावला. तसेच इंटरनेटवरुन आरक्षणासंदर्भात वेबसाईटवर शोधही सुरु केला. मात्र त्याठिकाणी त्यांची निराशा झाली. सरकारने याआधीच नोंदणीकृत प्रवाशांना सोडण्यात येईल, त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे नोंद करण्याचे बंधनकारक केले आहे. त्यांची आरोग्य तपासणी करुन ज्यांची प्रकृती ठिक आहे, अशानांच प्रवासाची परवानगी दिली जात आहे, असे रेल्वेच्या प्रसिद्धी विभागाने स्पष्ट केले आहे. रेल्वे प्रवासाची सर्व औपचारिकता राज्य सरकारच्या माध्यमातून स्वगृही जाणाऱयांना पूर्ण करावी लागणार आहे. यातील कोणालाही रेल्वेस्थानकावर तिकिट मिळणार नाही किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आरक्षणही केलेजाणार नाही. सरकारने जाहीर केलेल्या प्रवाश्यांशिवाय कोणीही रेल्वेस्थानकावर येऊ नये, असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे. घरी जाऊ इच्छिणाऱयांनी आधी जिल्हा प्रशासनाकडे नोंद करावी, त्यांना आरोग्य प्रमाणपत्र आणि त्यांच्या हातांवर शिक्के मारले जाणार आहेत. तसेच प्रवासात मास्क वापरणे अत्यावश्यक असेल. या प्रवाशांना एकवेळचे जेवणही दिले जाणार आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.