(अध्याय सहावा)
परब्रह्म सावयव होऊन श्रीकृष्ण रुपात द्वारकेत अवतरले आहेत हे कळल्यावर सर्व देवगणांनी त्यांचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी केली. केवळ देवगण आले असे नाही तर श्रीरंगाला पहायला पाताळींचे पन्नग आले. सिद्ध चारण, विद्याधर समुदाय कश्यपादि ऋषीश्वर, अर्यमाद पितर, गुह्यक आणि किन्नरही आले. या सर्वांच्या विमानांची द्वारकेच्या अवकाशात एकच गर्दी उडून गेली. श्रीकृष्णाचे विलोभनीय रूप पाहून ते सर्व विस्मयचकित झाले. तसेच द्वारकेचे वैभव पाहून त्यांचे डोळे विस्फारले. या सर्वांना श्रीकृष्ण कसे दिसले याचे वर्णन करताना नाथ म्हणतात, ‘शरीराची सुरेख ठेवण असलेले सुरनरामध्ये अत्यंत मनोहर असे श्रीकृष्ण पाहून देवांचे डोळे तृप्त झाले. डोक्मयावर मुकुट, कानी कुंडले कमरेला मेखला, सोन्यासारखा झळाळणारा पितांबर, गळय़ात वनमाला यांनी तो घननीळ अतिशय शोभून दिसत होता. द्वारकेतल्या मंदिरांचे कळस सोन्याचे होते. त्यावर रत्ने जडवली होती. कामधेनु, कल्पवृक्ष, चिंतामणी यांची तेथे रेलचेल होती. रिद्धी सिद्धीस दासी करून, तेथे हृषीकेश नांदत होता. श्रीकृष्णाला किती पाहू आणि किती नको असे सर्वांना झाले होते. ते श्रीकृष्णावर पर्जन्यवृष्टी करू लागले. मंदार, पारिजातक, हरिचंदन, कल्पतरू अशा सुवासिक फुलांचा वर्षाव करू लागले. पुढे येऊन मोठय़ाने त्यांचा जयजयकार करू लागले. अनेक प्रकारची पदे, रचना इत्यादी कवनांनी देवांनी श्रीकृष्णाची स्तुती करावयास सुरुवात केली. आश्चर्याचा धक्का ओसरल्यावर त्यांनी श्रीकृष्णाची स्तुती करण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, ‘हे भगवंता काया, वाचा, मने करून आम्ही तुझ्या चरणांना वंदन करतो. इंद्रिये शांत व्हावीत म्हणून विषयवासना सोडून, दहाही इंद्रिये तुझ्याकडे लावून आम्ही तुला नमस्कार करतो. कित्येक मुमुक्षु तुझे चरण पहायला मिळावे म्हणून ध्यान करतात. तेच चरण आज आम्ही पहात आहोत. आम्ही किती भाग्यवान. सूर्य जसा आपल्या किरणांच्या परावर्तनाने मृगजळ तयार करतो आणि तो मावळला की ते नाहीसे होते, त्याप्रमाणे तू अलिप्त राहून सर्व लीला करतोस. तुझी चरणधुळ त्रैलोक्मयातील महापातकांना नष्ट करते. तुझ्या स्तवनाने स्तवन करणारा तर तरून जातोच, पण ऐकणाऱयाचाही उद्धार होतो. परीक्षित राजा श्रवणानेच तरून गेला. तू भक्तांच्या भक्तीला भुलून जातोस. तुझ्या चरणांचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे देवांना, भक्तांना स्वर्गसुख देणारे चरण, अधर्मी लोकांना नरकात टाकतात. काळाचा तूच खरा नियंता आहेस म्हणून त्याला अकाली घाला घालता येत नाही. (काळ आला होता पण वेळ आली नव्हती असे काही वेळा घडते ते यामुळेच! किवा देव तारी त्याला कोण मारी असेही म्हणतात) हे अनंता, सृष्टीचा उत्पन्नकर्ता, पालनकर्ता तूच आहेस. तुझी वीर्यशक्ती घेऊन पुरुषाला पुरुषत्व येते. ते अमोघ वीर्य अतिशय सामर्थ्यवान असल्यामुळे प्रकृती अखिल ब्रह्मान्ड आपल्या उदरात वाढवते. गर्भाला जसे वारेचे आवरण असते तसे ब्रम्हांडाभोवती पंचमहाभूते, अहंकार आणि अत्यंत प्रबळ असे क्रियासूत्र अशी सात आवरणे तू तयार केलीस. याप्रमाणे हे जगत प्रकृती व पुरुष यापासून तयार झाले. म्हणजेच या विश्वाचा तूच एकटा निर्माता आहेस.
क्रमशः