श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीर खोऱयासह उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढल्याचे दिसून येत आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगढ, राजस्थान या भागांत थंडीची लाट आली आहे. काश्मीर खोऱयातील अनेक ठिकाणचा पारा शून्याच्या खाली गेला असून हवामान खात्यातील नोंदीनुसार श्रीनगरमध्ये उणे 8.8 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंद झाले आहे. गेल्या 30 वर्षातील हा निचांक असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 1991 मध्ये 11.4 अंश सेल्सिअस इतक्या न्यूनतम तापमानाची नोंद झालेली आहे. शनिवारी रात्री काझीगंद येथील तापमान उणे 8.8 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तल गुलमर्गचे तापमान उणे 10 अंश सेल्सिअसपेक्षाही खाली गेले होते.
पहलगाम, कुपवाडा, कोकेर्नग आदी ठिकाणचे तापमानही शून्याच्या खाली आल्यामुळे अनेक ठिकाणचे पाणवठे गोठले आहेत. नळाचे पाणीही गोठल्याने पाणीपुरवठय़ात अडथळे निर्माण झाले आहेत. पुढील दोन ते तीन दिवस तरी ही स्थिती अशीच कायम राहील असे वेधशाळेतील सूत्रांचे म्हणणे आहे.
काश्मीरमध्ये हिवाळय़ाच्या हंगामात जवळपास चाळीस दिवस तरी सलग कमालीचा गारठा असतो. हा थंडीचा मौसम सध्या सुरू आहे. आता दोन-चार दिवसांनंतर ‘चिल्लाई खर्द’ म्हणजे कमी थंडीचा कालावधी आणि त्यानंतर दहा दिवसांनी ‘चिल्लाई बच्चा’ हा हलक्या थंडीचा कालावधी सुरू होणार आहे.
महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव
उत्तरेतील थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्र व विदर्भाच्या दिशेने वाहत आहे. यामुळे राज्यातील थंडीत वाढ झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांनंतर राज्यातील थंडी पुन्हा काहीशी कमी होईल. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे नीचांकी 7.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. राज्यातील काही भागांत थंडीचा कडाका वाढला आहे. मध्य महाराष्ट्र व विदर्भात थंडीने पुन्हा हुडहुडी भरवली आहे. दरम्यान, उत्तर केरळ ते कर्नाटकाचा परिसर आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात मागील दोन दिवसांपासून कमी दाबाचा पट्टा सक्रिय होत आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र व मराठवाडय़ाच्या काही भागांत ढगाळ वातावरण आहे. यामुळे मराठवाडा व मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात थंडी कमी आहे.