केंद्र सरकारचा निर्णय, कॅमेरे जमा करण्याचा आदेश – जॅमर बसविण्याची तयारी
श्रीनगर / वृत्तसंस्था
भारतीय वायुदलाच्या जम्मू येथील तळावर हल्ला झाल्यानंतर एक आठवडय़ाने श्रीनगर आणि जम्मू-काश्मीरच्या अनेक जिल्हय़ांमध्ये ड्रोन्स तसेच कोणत्याही प्रकारच्या बिगर मानवसंचालित (अनमॅन्ड) वायूवाहनांवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. जम्मू, कठुआ, राजौरी आदी जिल्हय़ांचा या बंदीत समावेश आहे.
या प्रदेशांमधील ज्या लोकांकडे खासगी ड्रोन्स किंवा त्याचे कॅमेरे असतील त्यांनी ते विनाविलंब सरकारजमा करावेत, असा आदेश श्रीनगर जिल्हा प्रशासनाने काढला आहे. ड्रोन किंवा तत्सम साधने व त्यांचे सुटे भाग जवळच्या पोलीस ठाण्यात जमा करावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. अशी साधने आपल्याजवळ ठेवणे, त्यांची वाहतूक करणे, अशी साधने दुसऱया कोणालाही देणे, विकणे, किंवा कोणत्याही प्रकारे त्यांचा उपयोग करणे पूर्णतः प्रतिबंधित करण्यात आले आहे.
सरकारी विभागांनाही आदेश
जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासन किंवा केंद्र सरकारी विभागांनाही यापुढे ड्रोन उडविण्यासाठी पोलिसांची अनुमती घ्यावी लागणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये जम्मू भागामध्ये चारवेळा ड्रोन्सचे दर्शन झाले आहे. जम्मू तळावर झालेल्या हल्ल्यात दोन सैनिक किरकोळ जखमी झाले होते. तथापि, ड्रोन हल्ले हा नवा प्रकार असल्याने त्याची गंभीर दखल सरकारने घेतली असून कठोर कारवाई केली जाणार आहे.
पहिल्यांदाच असा हल्ला
भारत-पाकिस्तान संघर्षात आजवर प्रथमच ड्रोन हल्ला करण्यात आला होता. जम्मू हल्ल्यात उपयोगात आणण्यात आलेले ड्रोन स्वस्त तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनविण्यात आलेले होते. मात्र ते अचूक हल्ला करण्याच्या क्षमतेचे होते. त्यात चार ते पाच किलो स्फोटके होती असे प्राथमिक तपासात आढळले आहे. या हल्ल्याची सखोल चौकशी स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येत आहे. या हल्ल्यात या तळावर एकंदर दोन स्फोट घडविण्यात आले. तथापि, तेथे उभ्या असलेल्या एमआय हेलिकॉप्टर्सची कोणतीही हानी झाली नाही, असे स्पष्ट केले गेले.
तामिळनाडू, केरळमध्ये दक्षता
जम्मू मधील ड्रोन हल्ल्यानंतर दक्षिण भारतातील तामिळनाडू आणि केरळ या दोन राज्यांमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. या दोन्ही राज्यांपासून जवळ असणाऱया श्रीलंकेतील हंबनथोटाचे बंदर चीनने आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे या दोन्ही भारतीय राज्यांना चिनी ड्रोन हल्ल्याचा धोका आहे. त्यामुळे पूर्वतयारीचा भाग म्हणून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला.
दाट लोकवस्त्यांनाही संरक्षण
भारतीय सेनेचे महत्वाचे तळ, आस्थापने यांच्यासह दाट लोकवस्तीच्या भागांच्या वायुक्षेत्राचा उपयोग करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास कठोर कारवाई केली जाईल. खासगी उपयोगकर्त्यांना वायु क्षेत्र बंद करण्यात आल्याचा आदेश श्रीनगरचे जिल्हाधिकारी मोहम्मद एजाझ यांनी काढला.