ऑनलाईन टीम/तरुण भारत
जम्मू-काश्मीर भागात भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाया सुरूच आहे. भारतीय जवान शोध मोहीम राबवून दहशतवाद्यांचा खात्मा करत आहे. मंगळवारी मध्यरात्री श्रीनगर डाउन-टाउनच्या रैनावरी भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले. चकमकीच्या ठिकानाहून शस्त्रे आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे. ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यापैकी एक दहशतवादी शाहबाद वीरी बिजबेहारा येथील रहिवासी अब्दुल हमीद भट याचा मुलगा रईस अहमद भट हा पूर्वी पत्रकार होता. ऑगस्ट 2021 मध्ये दहशतवादी संघटनेत सामील होण्यापूर्वी तो व्हॅली न्यूज सर्व्हिस या खोऱ्यात कार्यरत असलेल्या ऑनलाइन पोर्टलचा मुख्य संपादक म्हणून काम करत होता.
पोलिसांना रात्री उशिराच रैनावरी येथे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यामाहितीच्या आधारे मध्यरात्री सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरु होती. यावेळी एका ठिकाणी लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. तर जवानांनी प्रत्युत्तर देण्याआधी दोन दहशतवाद्यांना अनेक वेळा आत्मसमर्पण करण्याची संधी दिली, परंतु त्यांनी गोळीबार सुरूच ठेवला. रात्री 12.45 वाजता चकमक सुरू झाली जी सुमारे एक तास चालली आणि दोन्ही दहशतवादी मारले गेले. गोळ्यांनी छिन्नविछिन्न झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांचे मृतदेहही सापडले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवादी रईस हा गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अचानक बेपत्ता झाला होता. यावेळी त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांना रईस बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल दिली होती. त्यांनतर पोलीस त्याचा शोध घेत होते.पण काही दिवसांनी रईस हा दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयब्बामध्ये सामील झाल्याची माहिती मिळाली. तर त्याच्याविरोधात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा सी श्रेणीतील दहशतवाद्यांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी चकमकीत ठार झालेल्या दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटली आहे. हिलाल अहमद राह उर्फ शब्बू मुलगा सफिर अहमद असे त्याचे नाव आहे. गेल्या वर्षी हिलाल अहमद राह उर्फ शब्बू मुलगा सफिर अहमद ऑक्टोबरमध्ये घरातून बेपत्ता झाला आणि त्यानंतर तो लष्कर-ए-तोयब्बा या दहशतवादी संघटनेत सामील झाला. त्याला देखील पोलिसांनी दहशतवाद्यांच्या सी श्रेणीच्या यादीत ठेवले होते.